9 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित थकबाकीदारांवर महावितरणची कारवाई


छत्रपती संभाजीनगर,२५ मार्च  / प्रतिनिधी :- 
 वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 9 हजार 71 थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला.
    थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
    यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात सुटीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. यासह घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे.
    औरंगाबाद परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीतील 3 लाख 79 हजार 546 ग्राहकांकडे 650 कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. शहर मंडलातील 1 लाख 13 हजार 174 ग्राहकांकडे 60 कोटी 24 लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्रामीण मंडलातील 1 लाख 58 हजार 748 ग्राहकांकडे 370 कोटी 51 लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. जालना मंडलातील 1 लाख 7 हजार 624 ग्राहकांकडे 219 कोटी 47 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी न भरणाऱ्या औरंगाबाद परिमंडलातील 9 हजार 71 जणांचा वीजपुरवठा खंडित आला आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडलातील 2095, औरंगाबाद ग्रामीण मंडलातील 4071 तर जालना मंडलातील 2905 ग्राहकांचा समावेश आहे.