लोकशाहीवरचा घाला! हा आवाज दाबवण्याचा प्रयत्न – सिंघवी

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली असून विरोधकांकडून केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. आवाज दाबवण्याचा हा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न असून हा लोकशाहीवरचा घाला असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले.

पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींच्या कारवाईवरुन सरकारला धारेवर धरले.सिंघवी म्हणाले, राहुल गांधींवर आधी राजकीय कारवाई करण्यात आली त्यानंतर कायद्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाला. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत कारण हा भारतासाठी, सर्व राजकीय पक्षांसाठी, सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी हा सर्वात मोठा राजकीय प्रश्न आहे. हा राजकीय मुद्दा आहे कारण हा पद्धतशीरपणे लोकशाही संस्थांवर घाला आहे. बदनामी करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपवाद आहे, हे मान्य आहे. पण गेल्या काही वर्षात आपण काहीही विचार न करता अशा प्रकारे वारंवार झाल्याचे पाहिले असेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, राहुल गांधी संसदेत आणि संसदेच्या बाहेरही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर बिनधास्तपणे बोलत असतात. याचीच किंमत त्यांना सध्या मोजावी लागत आहे. सरकार त्यांना घाबरले आहे. आवाज दाबण्यासाठी सरकार आता नवंनवे तंत्र शोधत आहे, असेही यावेळी सिंघवी म्हणाले.