वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात पावसासह गारपीट ; रब्बी पिकांना फटका

वैजापूर ,१८ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील पारळा, निमगांव व आसपासच्या काही गावांमध्ये शनिवारी (ता.18) सायंकाळी वादळी वाऱ्यांसह तुफान गारपीट  झाली. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांना फटका बसला आहे. काढणीला आलेल्या गहू, मका, हरभरा,बाजरी या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या रविवारी व सोमवारी तालुक्यातील बहुतांश मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.तालुक्यात 40 गावांतील सुमारे 62 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

आज सायंकाळी तालुक्यातील डोंगरथडी भागातील पारळा, निमगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली आहे.