आजपासून महिलांना एसटी  प्रवासात ५० टक्के सवलत

मुंबई,१७ मार्च  /प्रतिनिधी :-उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अखेर या आदेशाचा जीआर जारी करण्यात आला असून शुक्रवारपासून (१७ मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. एसटी महामंडळाची ही योजना महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील प्रवाशांसाठी यापूर्वीच सवलती जाहीर केल्या आहेत. राज्य सरकारकडून सुमारे ३० प्रकारच्या सवलती दिल्या जातात. सवलत शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला केली जाते. राज्य परिवहन महामंडळाकडून ३० विविध सामाजिक गटांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे.

राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना प्रवासी तिकिटाच्या भाड्यात ३३ ते १०० टक्के सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत जाहीर केली होती. ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटी प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.

सरकारने ९ मार्च रोजी एसटी प्रवासात सवलती देण्याची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी आदेश (जीआर) आवश्यक आहे. सरकारी आदेशाशिवाय कोणतीही घोषणा लागू होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळातील सर्व महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर काढण्यात आला नव्हता.