“मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात रस नाही” सभागृहात का संतापले अजित पवार?

मुंबई,१५ मार्च  /प्रतिनिधी :-आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “आज ८ लक्षवेधी असून पण सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ७ लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. असे वाटते की, मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही,” असे म्हणत अजित पवारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन संताप व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, सभागृहात मुख्यमंत्री नसतील तर संसदीय कामकाज मंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, असा सल्ला दिला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “मंत्र्यांना विधिमंडळाचे कामकाज सोडून इतर कामांमध्ये जास्त रस आहे. यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. अस बोलायला आम्हालाही योग्य वाटत नाही. पण, सभागृहातील कामाकाजाला मंत्र्यांनी महत्त्व दिले पाहिजे,” अशा शब्दात त्यांनी टीका केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “यावर मंत्र्यांना समाज दिला जाईल, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत माफी मागितली. ते म्हणाले की, “विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे. काल रात्री १ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरु होते. त्यामुळे ऑर्डर ऑफ डे ही रात्री १ वाजता निघाली. म्हणून मंत्र्यांना ब्रिफींगला वेळ मिळाला नाही.” असे स्पष्टीकरण दिले.