कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडली

सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढावा – अजितदादा पवार

मुंबई,१५ मार्च  /प्रतिनिधी :-जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्लू सदृश्य रोगाचे रुग्ण रोज वाढत असून या संपाचा फटका राज्यातल्या हजारो रुग्णांना बसत आहे. तरी सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून केली.

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. याबाबत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. या संपामुळे प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. प्रशासकीय सेवा शिक्षण व आरोग्य सेवेला मोठा फटका बसला आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्लू सदृश्य रोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. केंद्र सरकारनेसुद्धा त्याच्या तपासण्या वाढविण्यासाठी राज्यांना सूचना दिलेल्या आहेत. अहमदनगर पाठोपाठ नागपूरमध्ये एका व्यक्तीचा ‘एच३एन२’ फ्लूने मृत्यू झाला आहे. राज्यातील अत्यावश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एका रुग्णालयात तर १५० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. रुग्णांचे मोठया प्रमाणावर हाल होत आहेत, या गंभीर बाबीकडे अजितदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

अवकाळीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे थांबलेले आहेत. वास्तविक जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांबाबत शासकीय कर्मचारी, अधिकारी महासंघाने मागील ४-५ महिन्यांपासून शासनाकडे निवेदने व विनंत्या केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर जाण्याचा निर्णयही त्याचवेळी जाहीर केला होता. मात्र सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे. हा केवळ कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही, सर्व यंत्रणा ठप्प झाल्याने जनतेचे हाल होत आहेत. तरी शासनाने या संपकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्याशी चर्चा करावी आणि तोडगा काढावा, अशी मागणी अजितदादांनी केली.