लव्ह जिहादवरून नितेश राणे आणि अबु आझमी यांच्यात खडाजंगी

मुंबई,१४ मार्च  /प्रतिनिधी :-लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात विधान भवनाच्या आवारात जोरदार खडाजंगी झाली.

विधानभवनबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी मदरसे अनधिकृतपणे उभारले जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसे उभारले जात आहे, अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. तसेच त्या मदरशांवर कारवाई करताना हत्यारं काढली जातात, तारीख आणि वेळ सांगा, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो, असे आव्हानच नितेश राणे यांनी अबू आझमी यांना दिले.

त्यावर अबू आझमी यांनी मी तुम्हाला खोटं आहे सांगायला ५० ठिकाणी घेऊन जातो, असे प्रत्युत्तर दिले. अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचे असले तरी अनधिकृत बांधकाम तोडले पाहिजे असे मत मांडले. परंतू हत्यारे काढतात हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो. पण हे खोटं आहे. असे ते म्हणाले.

त्यानंतर नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात लव्ह जिहादची १ लाख प्रकरणं असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात लवकरच पुरावे सादर करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी आज माहिती दिली. त्याचवेळी विधान भवनाच्या आवारात आमदार अबू आझमी आले. त्यांच्यात लव्ह जिहादची प्रकरणं खोटी असल्याचे सांगत मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे आमदार अबू आझमी यांचे म्हणणे होते. यावरुन नितेश राणे आक्रमक झाले आणि पत्रकार परिषदेला या, त्यात मी पुरावे देणार असल्याचे त्यांनी आझमी यांना खडसावून सांगितले. तसेच तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा, असे नितेश राणे यावेळी अबू आझमींना म्हणाले.

त्यानंतर राणे यांनी माध्यमांशी बोलताना आझमी यांच्या लव्ह जिहादबाबतच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. लव्ह जिहाद आणि धर्मांतर याबाबत मी खरी माहिती देत आहे, हे त्यांना खटकले आहे. त्यामुळे त्यांची तडफड होत आहे, त्यामुळे ते माझ्या जवळ आले, त्यांची पोलखोल होईल, याची भीती त्यांना वाटत आहे.

परंतु, आपल्या हिंदू तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, तेव्हा हे जबाबदारी घेतील का? यांच्या हरकतीमुळे अशा लोकांना मदतच होत आहे. हे त्यांना कळत नाही. लव्ह जिहादवरून हिंदू तरुणींचे आयुष्य बरबाद होईल तेव्हा हे पुढे येतील का? यांच्या सारखा ज्येष्ठ माणूस मुलींचे आयुष्य बरबाद करत असेल, तर हे योग्य नाही, असा संताप भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.