भाजपचा कसबा पेठमधील पराभव हा खासदार गिरीश बापट आणि टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयामुळे-शरद पवार

महाराष्ट्रातील जनतेची राज्यात राजकीय बदलासाठी उत्कट इच्छा-शरद पवार

कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांची घेतली भेट

पुणे, ६ मार्च/प्रतिनिधीः-आज कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकरांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “भाजपचा कसबा पेठमधील पराभव हा खासदार गिरीश बापट आणि टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयामुळे झाला.” तसेच, ते म्हणाले की, “या पोटनिवडणुकीत महविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी कामे केली. हा महाविकास आघाडीचा विजय असून आगामी काळातसुद्धा तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहोत,” असेदेखील स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, “माझा प्रयत्न राहणार आहे की, विधानसभा आणि लोकसभेसाठी तिन्ही पक्ष एकत्र राहतील. लोकांनादेखील बदल हवा आहे. लोकांची इच्छा आहे की आम्हीं एकत्रित राहावे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, “या पोटनिवडणुकीत महविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी कामे केली. आमचा उमेदवार सगळ्यांना मान्य होता म्हणून तो निवडून आला. कसबा पेठ हा भाजपचा गड मानला जात होता. खासदार गिरीश बापट यांनी तिथे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांची गोष्ट वेगळी होती, कारण त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. म्हणूनच हा मतदारसंघ जड जाणार, असे काही लोकांची मते होती. पण गिरीश बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतले गेले त्याचा फटका भाजपला बसला,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील जनतेत राज्यात राजकीय बदल घडवण्यासाठी उत्कट इच्छा असून त्या बदलासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे तिला वाटते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.

“गेल्या काही आठवड्यांत मी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत फिरून अनेक लोकांना भेटतोय, असे सांगून पवार म्हणाले, राज्यात बदल घडवावा, असे लोकांनी मला सांगितले आहे. विरोधी पक्षांनी तो बदल साकारण्यासाठी एक व्हावे, असे त्यांना वाटते.” शरद पवार काँग्रेस-महाविकास आघाडीचे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र धंगेकर यांनाही भेटले. गेल्या आठवड्यात झालेल्या या निवडणुकीत धंगेकर यांनी सत्ताधारी भाजपचा २८ वर्षांपासूनचा हा गड पराभूत केला. राज्यात पुढील निवडणूक महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना) लढवेल असा पुनरुच्चार पवार यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले आमदार रवींद्र धंगेकरांचे कौतुक

“रवींद्र धंगेकर हा उमेदवार गाड्यांमध्ये फिरणारा नाही तर हा उमेदवार दुचाकीवर फिरणारा आहे. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. म्हणून दोन पायांचे लोक याला मतदान करतील, याची खात्री होती. रवींद्र धंगेकरांना यश मिळेल असे लोकांकडून ऐकायला मिळत होते.” असे म्हणत त्यांनी रवींद्र धंगेकरांचे कौतुक केले.