व्याजासकट परतफेड करणार! रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर वार

१९ तारखेला तयार राहा! कदमांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा

खेड: या १९ मार्चला खेडमधील याच ठिकाणी याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे गुलाब पाटील, शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सभा घेऊन उद्धव ठाकरेंची व्याजासकट परतफेड करणार असल्याचा घणाघाती वार रामदास कदम यांनी केला आहे. ते खेडमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ते म्हणाले, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आजही आहे आणि उद्याही असेल तसुभरही त्यात फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे मुंबई ठाणे, पुणे, सिंधूदूर्ग, रत्नागिरी इथून माणसं गोळा करुन आणणार आहेत जणू काही शिवाजी पार्क दसऱ्याची सभाच आहे. इतका धसका त्यांनी रामदास कदमांचा घेतला आहे. पण लोक भाषण एकतील आणि निघून जातील त्याचं पुढे काहीही होणार नाही. कारण मुळातच उद्धव ठाकरेंचे खेडमध्ये स्थानिक समर्थकच नाहीत.

उद्धव ठाकरेंच्या सभेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, “रामदास कदमांच्या किती धसका घेतलाय, हे कळून येतं” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी मला आणि माझ्या मुलाला कायमचे संपवायचे प्रयत्न केले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

या सभेआधी संजय कदम यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, “त्यांनी आमच्यावर लावलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर त्यांच्यावर मानहानीचा खटला करणार आहोत,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच, रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पहिले नेते असतील ज्यांनी आपल्या पक्षातील आमदाराला संपवले आणि दुसऱ्या पक्षातील भाड्याने विकत घेतले. हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधीच केले नव्हते.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. यावर रामदास कदमांनी या अशा सभेची मी नोंदही घेत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.