वैजापूर तालुका :अतिवृष्टीचे 111 कोटी 87 लाखाचे अनुदान कागदावरच

वैजापूर ,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील 82 हजार 262 हेक्टरवरील उभे पिकांची माती झाली.त्यामुळे स्वता कृषि मंत्री, स्थानिक सर्व पक्षातिल लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाउन पाहणी केली, फोटो सेशन केले कागद रंगवले तातडीने नुकसान भरपाईपोटी 111 कोटी 87 लाख 63 हजार रुपयांचा अहवालही शासनाला पाठवले, अजुन एक चमत्कार म्हणजे कोणी आठ तर कोणी पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची घोषणाही  सोशल मिडियावर करून ‘वाहवा’ मिळवली परंतु या सर्व प्रकाराला आता पाच महीने उलटूनही कोटीचे “अनुदान” कागदावरच व शेतकऱ्यांचे खाते रिकामेच आहे.विशेष म्हणजे अनुदान कुठे अडकले,कधी मिळणार याविषयी आता ना लोकप्रतिनिधी बोलायला तयार ना अधिकारी त्यामुळे कोणाला जाब विचारवे असा प्रश्न  शेतकऱ्यांना पडला आहे.

सप्टेबर महिन्यात तालुक्यातील अनेक भागात सातत्याने अतिवृष्टी झाली होती. तसेच अनेक महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नसली तरी सातत्याने पाऊस झाला होता. प्रारंभी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्या पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरूच होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाउन पाहणी केली.तसेच 

सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश महसूल व कृषी विभागास दिल्याने दिवाळी अखेरपर्यंत सर्व पंचनामे तसेच बाधित क्षेत्राचे अवलोकन करून तालुका प्रशासनाने 111 कोटी 87 लाख 63 हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली होती.दरम्यान,या सर्व प्रक्रिया होऊन आता पाच महीने उलटले मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही.शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून होत आहे.

अनुदानाची मागणी केली आहे-राहुल गायकवाड,तहसीलदार

पंचनामे तसेच बाधित क्षेत्राचे अवलोकन करून अनुदानची मागणी केलेली आहे.परंतु वरिष्ठस्तरावर  कोणत्या अडचणीमुळे अनुदानाला विलंब होत आहे.ते सांगता येणार नाही.