जी-२० परिषदेसाठी प्रतिनिधींचे विमानतळावर उत्साहात स्वागत ; समन्वय, सहकार्य, संवाद आणि सहमती निर्माण करणे व कृतीचे आवाहन ही डब्ल्यू 20 ची 4 धोरणे
औरंगाबाद,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद येथे G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन होत आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच त्यांचे औक्षवण करण्यात आले. जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचे स्वागत केले. शिष्टमंडळ विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासमोर लेझीमचे आणि इतर वाद्यांचे सादरीकरण केले. यावेळी करण्यात आलेल्या पारंपरिक स्वागतातून महिला सदस्यांमध्ये
विश्वास आणि आपुलकीचा संदेश निर्माण झाला. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या जिल्ह्यात जागतिक महिला परिषद होत असल्याने राज्याची संस्कृती आणि शिष्टाचाराची ओळख झाल्याने मनामध्ये वेगळाच आनंद निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक विदेशी पाहुण्यांनी विमानतळावर व्यक्त केली.

यावेळी केंद्रीय वित्त् राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार ज्योती पवार, श्री.निलावाड यांच्यासह लेझीम पथकाच्या अंजली चिंचोलकर यांच्यासह मुकूंदवाडी महानगर पालिकेतील शाळेच्या 18 मुली आणि 3 वादक मुले उपस्थित होते. परिषदेसाठी विविध देशातून एकूण 38 महिला सदस्य प्रतिनिधींचे आगमन झाले आहे.
विमानतळावर आलेल्या महिला प्रतिनिधींचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी स्वागत केले. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा आणि वेरुळ लेणीची तसेच औरंगाबाद शहराची थोडक्यात माहिती डॉ कराड यांनी शिष्टमंडळास देत दोन दिवसीय या परिषदेमध्ये तसेच विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.

यामध्ये एंजेला जू-ह्यून कांग, डॉ.संध्या पुरेचा, बन्सुरी स्वराज, डॉ.शमिका रवी, रविना टंडन, भारती घोष, केसेनिया शेवत्सोवा, एलेना म्याकोटनिकोवा, केल्सी हॅरिस, समंथा जेन हंग, प्रभिओत खान, आयेशा अक्तर, कार्लो सोल्डातिनी, उंडा लॉरा सब्बादिनी, जिओव्हाना आयेलिस, मार्टिना रोगाटो, , स्टेफानो डी ट्रेलिया, एल्विरा मारास्को, व्हेनेसा डी अलेस्सांद्रे, अँड्रिया ग्रोबोकोपटेल, सिल्व्हिया तारोझी, निकोलस बोरोव्स्की, कॅथरीना मिलर, हदरियानी उली तिरु इडा सी, येणें क्रिसंती, इस्तियानी सुरोनो, श्री वुर्यानिंगसिह, तंत्री किरणदेवी, हरियाणा हुताबरात, जॉइस फ्रान्सिस्का कार्ला यास्मिन, डेनाटालाइट क्रिस्डेमेरिया, डेनाटली क्रिस्डेमेरिया, फराहदिभा तेन्रीलेंबा, गुल्डन तुर्कन, यांचा समावेश आहे.
150 प्रतिनिधी डब्ल्यू 20 च्या प्रारंभिक बैठकीत सहभागी
डब्ल्यू 20 साठी भारताचा दृष्टिकोन प्रत्येक स्त्रीसाठी समानता आणि नि:पक्षपात सुनिश्चित करणे व महिलाप्रणीत विकासातील सर्व अडथळे दूर करणे, हा आहे
वुमेन -20 (W 20) च्या दोन दिवसांच्या प्रारंभिक बैठकीत नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगांमधील महिलांचे सक्षमीकरण, हवामान बदलाच्या आव्हानात परिवर्तनकारी कृतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवणारी महिलांची भूमिका, महिला नेत्यांसाठी तळागाळापर्यंत सक्षम परिसंस्था तयार करणे, लिंग आधारित डिजिटल भेदभाव कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि कौशल्य या माध्यमातून सुधारणा, शिक्षण आणि कौशल्याद्वारे महिलांसाठी मार्ग तयार करणे, महिलाप्रणीत विकासाला पूरक : धोरण आणि कायदेशीर आराखडा,यासारख्या विविध विषयांचा समावेश असेल. भारतात महिलाप्रणीत विकास या विषयावर एक विशेष सत्रही होणार आहे.
बैठकीच्या पूर्वसंध्येला आज औरंगाबाद येथे डब्ल्यू -20 अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी डब्ल्यू 20 च्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत बैठकीबाबत माहिती दिली. पुरेचा म्हणाल्या की, भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात डब्ल्यू 20 पाच प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल:
- तळागाळातील महिला नेतृत्व
- महिला नवउद्योजकता
- डिजिटल लैंगिक भेदभाव दूर करणे.
- हवामान बदलामध्ये महिला आणि मुलींद्वारे घडवता येणारे बदल.
- शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणाद्वारे विकास मार्ग तयार करणे.
पुरेचा म्हणाल्या की ,प्रत्येक महिला सन्मानानं जगू शकेल असं समानता आणि समतेनं परिपूर्ण जग महिलांसाठी निर्माण करणं, हे भारतात होत असलेल्या W-20 बैठकांचं उद्दिष्ट आहे. महिला प्रणित विकासातील सर्व अडथळे दूर करणं आणि महिलांना त्यांच्या तसेच इतरांच्याही जीवनात भरभराट, प्रगतीची झेप आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम-पूरक वातावरण आणि परिसंस्था उपलब्ध करुन देणं हे या बैठकांचं ध्येय आहे. W20 विविध ज्ञान उत्पादने सादर करेल, जसे की श्वेतपत्रिका, धोरण संक्षेप, व्हिडिओ माहितीपट, मतपत्रिका , हँडबुक, याशिवाय, जी 20 चर्चांच्या केंद्रस्थानी असलेल्या महिला विकासाबाबत विषयपत्रिका तयार करण्यासाठी जी 20 राष्ट्रे आणि नेत्यांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने संवाद यांचा यात समावेश असेल असे त्या म्हणाल्या.

सदस्य देश , अतिथी देश आणि विशेष निमंत्रित असे सुमारे 150 प्रतिनिधी उद्या होणाऱ्या चर्चासत्रामध्ये सहभागी होतील, अशी माहिती W-20 च्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी दिली. G20 नेत्यांचा जाहीरनामा आणि जी20 परिपत्रक यावर प्रभाव टाकण्याचा आणि महिला उद्योजकांमध्ये सक्रीय सहभागाबाबत सहमती आणि लिंग समानतेला चालना देणाऱ्या धोरणांबाबत बांधिलकी निर्माण करण्याचा W20 चा प्रयत्न असेल, असे त्यांनी या सक्रीय गटाची कार्यपद्धती स्पष्ट करताना सांगितले.

जन भागीदारी( लोकसहभाग)चा एक कार्यक्रम देखील आज शहरात आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांमधील महिला आणि तळागाळातील इतर अनेक स्तरांवर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसह समाजातील विविध स्तरातील सुमारे 1000 महिला सहभागी झाल्या. इंडोनेशियन शिष्टमंडळाच्या प्रमुख डॉ. फराहदिबा तेनरिलेम्बा, रशियन शिष्टमंडळाच्या एलेना मायकोतनीकोवा, दक्षिण कोरियन शिष्टमंडळाच्या अँगेला जू युन कांग, दक्षिण आफ्रिकन शिष्टमंडळाच्या सिबुलेले पोसवायो आणि जपानी शिष्टमंडळाच्या साटोको कोनो या संवादात्मक सत्रात सहभागी झाल्या. भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशावर आधारित महागामी यांनी सादर केलेल्या मंत्रमुग्ध सांस्कृतिक सादरीकरणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि प्रश्नोत्तराच्या फेरीने या कार्यक्रमाची सांगता झाली ज्यामध्ये भारताच्या महिलांनी W20 प्रतिनिधींशी संवाद साधला.

भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत सर्वांच्या कल्याणासाठी व्यवहार्य तोडगे काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि असे करत असताना खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग म्हणजे एक कुटुंब आहे ही भावना निर्माण होणार असल्याने या संघटनेच्या इतिहासात हा एक ऐतिहासिक कालखंड असेल असे डॉ. पुरेचा यांनी सांगितले.

W- 20 बैठकीच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांच्यासह विविध देशांमधली परदेशी प्रतिनिधी मंडळं आणि देशभरातील विविध समुदाय तसंच विविध वयोगटातल्या महिला याप्रसंगी उपस्थित होत्या.
सर्वसमावेशकतेचा आपला हेतू साध्य करण्यासाठी, भारताच्या जी 20 आणि W-20 अध्यक्षीय कारकिर्दीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक नागरिकांचा तळागाळापर्यंत सहभाग वाढवावा, हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे असे डॉ. पुरेचा यांनी सांगितले.

औरंगाबादचे पालकमंत्री डॉ. संदीपान भुमरे आणि एमजीएम विद्यापीठाचे निबंधक डॉ. आशिष गाडेकर यावेळी उपस्थित होते.