परभणी येथे एकूण १०५८ कोटी रुपये किंमतीच्या व ७५ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सुधारणा कार्याचे लोकार्पण आणि भूमिपूजन

हळदीसाठी प्रसिद्ध हिंगोली जिल्हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहोचवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन 

परभणी/ हिंगोली,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-   उत्तम पायाभूत सुविधांनी मराठवाड्याच्या विकासात एक पाऊल पुढे टाकत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री   नितीन   गडकरी यांनी आज परभणी  येथे एकूण १,०५८ कोटी रुपये किंमतीच्या व ७५ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सुधारणा कार्याचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. परभणी जिल्ह्याला समृध्दी महामार्गाद्वारे पुणे-मुंबईला कसे जोडता येईल, याकरिता आजच योजना तयार करायच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी,  खासदार संजय जाधव उपस्थित होते.

आज भूमिपूजन करण्यात आलेल्या पारवा ते असोला या बाह्यवळण महामार्गामुळे औद्योगिक, कृषी व अवजड मालाची वाहतूक जलद होण्यास मदत होईल. वेळेची व इंधनाची बचत होईल व सुरक्षित वाहतूक करणे शक्य होईल. जिंतूर ते शिरजशाहपूर हा हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ व नांदेड येथील गुरुद्वारा यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाच्या सुधारणेमुळे औद्योगिक, कृषी व साखर कारखान्यांसाठी वाहतूक सोयीची होईल. तसेच नांदेड, हिंगोली व परभणी हे जिल्हे छत्रपती संभाजी नगरला जोडले जातील.

पाथरी ते सेलू या महामार्गावर श्री संत साई बाबा यांचे जन्मस्थान पाथरी असल्यामुळे या मार्गामुळे भाविकांना याठिकाणी पोहोचणे सोयीचे होईल. हा विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे यामुळे नागरिकांची वाहतूक सुरळीत होईल.

सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जिल्ह्यातील मोरेगाव – हातनूर – वालूर – बोरी – वसा या नवीन रस्त्याच्या कामाला सीआरआयएफ अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त परभणी – गंगाखेड गोदावरी नदीवरील पुलासाठी १५० कोटी रुपयांसह मंजूरी देण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय इतर ५ रस्ते विकास प्रकल्पांच्या कामांना मंजूरी देण्यात आली.

केंद्रीय मंत्री  नितीन  गडकरी यांनी  हिंगोली येथे राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील वाशिम – पांगरे या १,०३७.४ कोटी रुपये किंमतीच्या व ४२.३० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचेही  आज लोकार्पण केले. यावेळी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी प्रामुख्याने उपस्थित होते. नव्याने मंजूर झालेल्या इंदौर – जबलपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे विदर्भासह हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील जनतेला त्याचा मोठा फायदा होणार आहे .हिंगोली जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. आता येथील हळद संशोधन केंद्राने गती घेतली आहे. शंभर एकर जागेत लॉजिस्टिक पार्क उभारला जाईल. त्यात हळद क्लस्टर साठी मोठा  संधी असून हळदीसाठी प्रसिद्ध हिंगोली जिल्हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी केले.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या भागातला शेतकरी समृध्द झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. स्मार्ट शहरे नाही तर स्मार्ट गावे झाली पाहिजेत. तरुण मुलांना मुंबई-पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. यासाठी आपल्या जिल्ह्यात काम मिळाले पाहिजे. या भागाचा ग्रोथ रेट वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाशिम व हिंगोलीच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते करु, असे सांगून शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे असे ते म्हणाले.  शेतकरी उर्जादाता व्हावा यासाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिजेल, बायोसीएनजी इलेक्ट्रीक, हायड्रोजन यासारखे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल.

आपल्या भागात हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. या भागात रस्त्याच्या बाजूने शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्यास ११०० कोटी रुपये खर्च करुन हळदीच्या कल्स्टरसाठी लॉजिस्टीक पार्क उभारण्यास १०० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. येथे हळदीपासून विविध उत्पादने निर्माण केल्यास आपली हळद जगाच्या नकाशावर येऊन साता समुद्रापलीकडे जाईल असा विश्वास दिला. सध्या जालना येथे एक्सपोर्ट-इम्पोर्ट सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

हिंगोली जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी जलसंवर्धनाची कामे झाली पाहिजेत. यात ब्रीज कम बंधारे झाले पाहिजेत. या माध्यमातून नदी, नाल्याचे खोलीकरण करुन गावातले पाणी गावात, घरातले पाणी घरात, शेतातले पाणी शेतात जिरले पाहिजे. तसेच नदी नाल्याचे खोलीकरण करुन पाणी साठवण क्षमता वाढवली पाहिजे. यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रशासनाने देखील जलसंवर्धनाच्या कामास प्राधान्य दिले पाहिजे.

मागील ८ वर्षात हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एकूण १३ कामे मंजूर करण्यात आली असून यांची किंमत ५ हजार ५८७ कोटी रुपये आहे. यापैकी ६ कामे पूर्ण झाली असून ७ कामे प्रगतीपथावर आहेत. अपूर्ण कामे पुढच्या चार महिन्यात पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी दिला. आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील वाशिम ते पांगरे महामार्गाचे चौपदरीकरणाचे लोकार्पण होत आहे. याचा मला आनंद आहे. नामदेव महाराजाच्या जन्मस्थानी रस्ता करण्यासाठी सीआरएफमधून मंजूरी दिलेली आहे. मी दिलेले वचन पूर्ण झाले आहे. विशेषत: वाशिम हिंगोली जिल्ह्यामध्ये १३  कामे मंजूर होती. त्याची किंमत ६ हजार कोटी रुपये होती. त्याची ६ कामे पूर्ण झाली असून ७ कामे प्रगतीथावर आहेत. आज वाशिम ते पांगरे याचे चौपदीकरण झाल्याचा आनंद झाला आहे.

वाशिम ते पांगरे या मार्गामुळे नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. गेल्या आठ वर्षात ५० लाख कोटी रुपयाची कामे करण्याची संधी मिळाली आहे. वारंगा फाटा रस्त्याचे काम पुढच्या महिन्यात मी माहूरला रोपवे आणि त्याच्या सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी येईपर्यंत पूर्ण होतील. तसेच येथे जंक्शन तयार करण्याची सूचना दिलेली आहे. हिंगोलीचा बायपास मंजूर करण्यात आलेला आहे. इंदोर ते हैद्राबाद नवीन रस्ता मंजूर केलेला आहे. यामुळे हिंगोली व वाशिमला हैद्राबादसाठी चांगली कनेक्टीविटी मिळणार आहे. उद्योग व्यापार वाढवण्यासाठी फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे आपली खूप सोय झाली आहे. संभाजीनगर ते पुणे हा द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हिंगोलीतून साडेतीन तासात संभाजीनगरला पोहोचणार आहे. या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचे सामाजिक, आर्थिक मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नामदेव महाराज आपले साहित्यिक, सांस्कृतिक वारसा आहेत. त्यांच्या गावचा रस्ता होतोय त्यामुळे मला आनंद होत आहे. या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास त्या उपलब्ध करुन देता येतील. आज भेंडेगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या ७५ कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी दिली. हिंगोली शहरात बासंबा फाटा येथे २० कोटी रुपयाच्या उड्डाणपुलाला सीआरएफ मधून मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाला चालना देण्याचे काम – पालकमंत्री अब्दुल सत्तार

राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे गेल्या आठ महिन्यात विकासाला चालना देण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकऱ्याला सक्षम करण्याचे काम झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी कनेक्टीविटी निर्माण झाली आहे. या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी मागणी  केलेल्या कामाला मान्यता देण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाच्या वतीने या जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या नानाजी देशमुख यांच्या नावाने कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा टप्पा क्र. २ ची १० हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील अकोला – वाशिम – हिंगोली – वारंगा फाटा या भागाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग अकोला, वाशिम, हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

वाशिम ते पांगरे या राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील भागाचे आज लोकार्पण करण्यात आले. या मार्गामुळे इंदौर – अकोला – वाशिम – हिंगोली – नांदेड – हैदराबाद ही वाहतूक सुरळीत होईल. या मार्गावर असलेल्या ११.९ किमी च्या बायपास रस्त्यामुळे कनेरगाव नाका आणि हिंगोली शहरातील वाहतूक सुलभ होईल. वेळेची व इंधनाची बचत होईल तसेच प्रदूषणाची पातळीही कमी होईल. स्थानिक शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे सोयीचे होईल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हिंगोली शहरात वासंबा फाटा याठिकाणी २० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाला मंजूरी देण्यात आली. वाशिम शहरातील मुख्य रस्त्याच्या ४-लेन कामास मंजूरी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर ३ महामार्ग कामांना मंजूरी दिली. याशिवाय वाशिमसारख्या आकांक्षित जिल्ह्यात  जलसिंचनासाठी २० तलावांचे खोलीकरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.