अरविंद केजरीवाल – उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई  : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. केजरीवाल आणि ठाकरे या दोघांनीही मागील काही काळापासून भाजप विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली असून त्या पार्श्वभूमीवर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “उद्धव ठाकरे हा वाघाचा मुलगा आहे. ते लढत असलेली लढाई जिंकणारच. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ. ” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात आणला ते कौतुकास्पद होते.” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई असून ती वाढतच चालली आहे. काही उद्योगपतींच्या भल्यासाठी केंद्र सरकार देशाला वेठीस धरत आहे. आम्हाला एकमेकांच्या विरोधात लढायचे नाही तर, सोबत मिळून काम करायचे आहे.”

ही भेट पूर्णतः अनौपचारिक असून यात आम्ही विविध विषयांवर चर्चा केल्याचे केजरीवाल यांनी म्हटल आहे. तसेच कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी आणि महाराष्ट्रासह मुंबईत राबवलेला कोरोना मुक्तीचा पॅटर्न याचा आम्हाला दिल्लीतील कोरोनास्थिती हाताळण्यात मोठा हातभार लागल्याचे म्हणत केजरीवालांनी ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री आणि आबांनी पक्षाचे नेते भगवंत मान यांच्यासह आम आदमी पक्षाचे इतर नेते आणि आदित्य ठाकरे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले आहे.