राज्यातील सत्तासंघर्षावर २८ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

‘मी ही केस जिंकेन किंवा हरेन, पण…’ कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाचा केला भावनिक शेवट

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सलग तीन दिवस सुरू असलेली सुनावणी आज एक तास आधीच संपली. आता पुढची सुनावणी २८ फेब्रुवारी पासून होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

पुढच्या आठवड्यात पुन्हा तीन दिवस सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यानुसार ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सत्तासंघर्षावरील सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवले. जर, बहुमत चाचणीला सामोर गेला असता तर आम्ही ती चाचणी रद्द ठरवली असती, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे.

आजच्या सुनावणीमध्ये बहुमत चाचणी, राज्यपालांनी घेतलेली भूमिका या सर्व घटकांवर जोरदार युक्तिवाद झाला.

अडीच दिवसांच्या युक्तिवादाची सिब्बलांकडून भावनिक सांगता

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या आज तिस-या दिवशी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास अडीच दिवस युक्तिवाद केला. आजही (२३) त्यांच्याच युक्तिवादाने कामकाजाची सुरुवात झाली. आजही कपिल सिब्बल यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित केले. मी ही केस जिंकेन किंवा हरेन.. त्यासाठी इथे उभा नाही, तर घटनात्मक नैतिकता टिकून राहावी, जी आपण देशात १९५० पासून रुजवत आलो आहोत, यासाठी मी उभा आहे, असे म्हणत त्यांनी आजच्या युक्तिवादाची भावनिक सांगता केली.

ठाकरे गटाकडून जवळपास अडीच दिवस अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आज सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाकडून अ‌ॅड. अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद केला. आज एक तास आधीच सुनावणी संपली.

वकील कपिल सिब्बल आपला युक्तिवाद मांडत असताना म्हणाले की, “राज्यपाल हे स्वत:हून बहुमत चाचणीसाठी विनंती करु शकत नाहीत. एखादा गट राज्यपालांकडे जाणे गरजेचे असते. त्यावेळेस राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला,” असा आरोप त्यांनी यावेळी केला. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. ते म्हणले की, “ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयाची दिशाभूल करत आहे. राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव व बहुमत चाचणी यांची पत्र होती.” अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे कपिल सिब्बल युक्तिवाद करताना म्हणाले की, “त्यावेळेस राज्यपालांनी आधी मोठ्या पक्षाला विचारायला हवे होते. तसेच, गोगावले यांची केलेली प्रतोद म्हणून निवड योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. सत्तास्थापनेवेळी राज्यपालांची भूमिका संशायस्पद होती, असा दावा यावेळी कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केला. पुढे ते म्हणाले की, “सत्ता शिवसेनेची असताना शिवसेनेचे काही आमदार सरकार कसे पाडू शकतात? शिवसेनेचे आमदार अविश्वास प्रस्ताव कसा आणू शकतात?” असा जोरदार युक्तिवाद त्यांनी केला.

राज्यपालांच्या भूमिकेवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, “राज्यपालांनी सर्व गोष्टी मंत्रिमंडळाला विचारून करायला हव्या होत्या. राज्यपालांनी विद्यमान सरकारला नियम डावलून शपथ दिली. त्यांनी अपात्रतेची नोटीस असलेल्या आमदारांना वगळून बहुमत चाचणी घेणे अपेक्षित होते. आजवर इतिहासामध्ये कोणत्याही राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी कुणलााही बोलावले नाही.” असा युक्तिवाद त्यांनी केला.