काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी:- रायपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला जात असताना पक्षाचे नेते पवन खेरा यांना आज आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केली होती. याबाबत वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

खेरा यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने दुपारी ३ वाजता सुनावणी सुरू केली आणि सुमारे ३५ मिनिटे सुनावणी घेतल्यानंतर पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने आसाम आणि उत्तर प्रदेश सरकारांना नोटिसाही बजावल्या आणि तीन ठिकाणी नोंदवलेले खटले एकाच अधिकारक्षेत्रात आणण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. आसाम सरकारच्या वतीने एएसजी ऐश्वर्या भाटी यांनी युक्तिवाद केला.

आज सकाळी खेरा यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून उतरवले आणि त्यानंतर आसाम पोलिसांनी अटक केली. रायपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात खेरा सहभागी होणार होते. या कारवाईच्या निषेधार्थ विमानात उपस्थित असलेले इतर काँग्रेस नेते भाजपविरोधात घोषणाबाजी करत विमानातून खाली उतरले.

पवन खेरा २० फेब्रुवारी रोजी पत्रकारांशी बोलताना “जेव्हा अटलबिहारी वाजपेयी जेपीसी बनवू शकतात, तेव्हा नरेंद्र गौतम दास मोदींना काय अडचण आहे.” असे म्हटले. त्यांनी दामोदरदास मोदींना म्हणजेच मोदींच्या वडिलांना गौतमदास मोदी असे संबोधल्याने, याच दिवशी लखनऊ महानगर भाजपचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ते म्हणाले की, खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. वाईट हेतूने त्यांनी हे विधान केले आहे.