पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

देश भ्रष्टाचारमुक्त होतोय, काँग्रेस २जीत अडकली आपण ५जीकडे वाटचाल करतोय-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली,​८​ फेब्रुवारी / प्रतिनिधी:- आव्हानांशिवाय आयुष्य नाही, मात्र आव्हानांपेक्षा जास्त सामर्थ्यवान, १४० कोटी जनतेचे सामर्थ्य आहे. आव्हानांपेक्षा त्यांचे धैर्य, साहस मोठे आहे. कठीण काळ, युद्धासारखी परिस्थिती, अनेक देशात असलेली अस्थिरता, भीषण महागाई, अन्नाचा तुटवडा आणि आपल्या शेजारील देशात नागरिकांना खायला अन्न मिळत नाही. अशावेळीही आपला भारत देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर संबोधन केले. मात्र मोदी भाषणाला उभे राहण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीला ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यावेळी गौतम अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मोदींनी थेट हल्लाबोल केला. “प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपले म्हणणे मांडले. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येते की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजते,” असे मोदी म्हणाले.

प्रत्येक सदस्याने या चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपले म्हणणे मांडले. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येते की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजते. या सर्व बाबी समोर आल्यानंतर देश त्याचे मूल्यांकन करत असतो. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व खासदारांचे आभार मानतो. मात्र मी काल पाहात होतो, काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टिम, समर्थक आनंद व्यक्त करत होते. एक मोठा नेता राष्ट्रपतींचा अपमानही करतो, आदिवासी समाजाप्रती द्वेष दाखवतो, मात्र अशा गोष्टी टीव्हीसमोर बोलल्या गेल्या, ते म्हणजे त्यांच्या जे पोटात होते ते ओठात आले,’ असे म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.

मला वाटले होते, राष्ट्रपतींच्या भाषणावर कोणी सदस्य काही नोंदी लिहून घेतले असतील, त्यावर आक्षेप उपस्थित करतील. पण कोणीही विरोधी खासदारांनी त्याला विरोध दर्शवला नाही. ते सर्व स्वीकारले याचा मला आनंद आहे. सभागृहात चेष्टा मस्करी, हास्यविनोद होत राहतात. मात्र राष्ट्रहितासाठी गौरव क्षण आपल्याला मिळत आहेत हे विसरुन चालणार नाही. १०० वर्षानंतर महाभयंकर आजाराची साथ, युद्धजन्य स्थिती अशा स्तिथीतही देशाला ज्यापद्धतीने सांभाळले गेले, त्यामुळे संपूर्ण देशाला आत्मविश्वास मिळाला आहे, गौरव मिळाला आहे. आज भारताकडे जगभरातील समृद्ध देश आशेने पाहत आहेत. त्यामुळेच जी २० सारखे देश आपल्याकडे येत आहे. ही १४० कोटी जनतेसाठी गौरवाची बाब आहे. मात्र मला वाटते, पहिले वाटत नव्हते, पण आता वाटते की यामुळेही काहींना वाईट वाटतेय. १४० कोटी जनतेपैकी ते कोण लोक आहेत ज्यांना याचे वाईट वाटतेय, असा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी हाणला.

‘२००४ ते २०१४ हे इतिहासातले सर्वात वाईट दशक’; असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जगभरातले अनेक देश कठीण काळातून जात असताना आपला देश प्रगतीपथावर आहे. मात्र काही निराशावादी लोक हे आजही निराशेतच बुडाले आहेत.” असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘२००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातले सर्वात वाईट दशक होते,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “वर्ष २००४ ते २०१४ या दशकात भारतीय अर्थव्यवस्था चांगलीच ढासळली होती. या दहा वर्षात महागाई दोन अंकी झाली. त्यामुळेच काही चांगले झाले की या लोकांची निराशा वाढते. या लोकांनी बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं दिली होती त्यांनी फक्त त्यासाठीचे कायदे तयार केले. या दशकात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते. त्यांच्या काळामध्ये देश सुरक्षित नव्हता. त्या दशकात भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर इतका कमकुवत होता की, कोणीही ऐकायला तयार नव्हते. भारताचा आवाज जागतिक मंचावर कमकुवत झाला होता. यांच्या निराशेचे कारण हेदेखील आहे की आज देशाच्या क्षमतेचा परिचय जगाला होतो, तेव्हा यांना वाईट वाटते”

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “त्या दशकात टेक्नॉलॉजी वाढत होती तेव्हा हे २जीमध्ये अडकून गेले. सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली तेव्हा हे घोटाळ्यात अडकले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले, पण देशाचे नाव या कॉमनवेल्थ घोटाळ्यांमुळे बदनाम झाले. जगाभरात भारताची अब्रू गेली. कोळसा घोटाळाही यावेळी चर्चेत आला होता. २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातले घोटाळ्यांचे दशक होते.” अशी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, २००८ चा हल्ला आजही कुणीही विसरू शकत नाही. मात्र दहशतीला जशास तसे उत्तर देण्याची हिंमत त्यावेळेस कोणामध्येच नव्हती. आपल्या देशातल्या निरपराध लोकांचे रक्त विनाकारण वाहिले. हे दशक देशातले सर्वात वाईट दशक म्हणून ओळखले जणार आहे. तर २०२३चे दशक हे देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे दशक ठरले, हे कोणीही नाकारू शकत नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

आता राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी अनके सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो दाखवत टीका केली होती. त्यांच्या संबंधांवरून अनेक प्रश्नदेखील विचारले होते. मात्र, आजच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कोणतेही उत्तर दिले नसल्याची टीका राहुल गांधींनी केली.

राहुल गांधी म्हणाले की, ” पंतप्रधान मोदी शॉकमध्ये होते. त्यांनी मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. मी फक्त विचारले होते की उद्योगपती अदानींसोबत किती वेळा गेला होतात? किती वेळा त्यांना भेटला होतात? असे अगदी सोपे प्रश्न होते. पण त्यांनी आजच्या भाषणामध्ये एकही उत्तर दिले नाही. मी समाधानी तर नाहीच, पण यातून सत्य समोर येत आहेत. मोदी चौकशीबद्दल काहीही बोलले नाहीत. मित्र नाही ठीक आहे, पण मग चौकशी करतो, असे का म्हणाले नाहीत? शेल कंपन्या आहेत, बेनामी मालमत्ता आहे, या सगळ्यावर मोदी काहीच बोलले नाहीत. म्हणजे हे स्पष्ट आहे की ते अदानींना पाठीशी घालत आहेत. त्यांना मोदी वाचवत आहेत.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.