हा तर दगाबाज सरकारचा अर्थ संकल्प-विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची टीका

औरंगाबाद,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.आजच्या अर्थसंकल्पात शेतीच्या  दृष्टीने विचार केल्यास फलोत्पादन, सहकार सारख्या विभागाला अतिशय तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. कापूस उत्पादकांना भरघोस मदत करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात केली, मात्र सरकारने ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करण्याचा निर्णय का घेतला असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.  एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार असे जाहीर करायचे आणि दुसरीकडे कापूस आयातीचे धोरण राबवायचे  हा मोदी सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही दानवे यांनी केली.

२०१४ पासून मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे. २०१४च्या तुलनेत आता पाहिल्यास मोठया प्रमाणात वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झाली असल्याचे दानवे यांनी म्हटले.