भारतात गेल्या चोवीस तासांत 65,081 रुग्ण बरे,819 मृत्यूंची नोंद
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020
प्रतिदिन 60,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा सलग पाच दिवस चाललेला कल कायम ठेवत, गेल्या चोवीस तासात भारतात 65,081 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 28,39,882 असून त्यानुसार कोविड-19 च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर आणखी वाढून 77% झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3.61 पटीने जास्त आहे.
भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,85,996 असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20.53 लाखाहून जास्त आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चार पट वाढली आहे.
गेल्या 24 तासात पाच राज्यांमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. ती आकडेवारी पुढीलप्रमाणे :
- महाराष्ट्र -11,852
- आंध्रप्रदेश – 10,004
- कर्नाटक – 6,495
- तामिळनाडू – 5,956
- उत्तर प्रदेश – 4,782
या पाच राज्यांमधील रुग्णांची एकूण संख्या गेल्या 24 तासात देशभरात आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येच्या 56% आहे.
या पाच राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी पाठवल्याचीही नोंद झाली असून ती संख्या देशभरातल्या 65,081 बरे झालेल्या रुग्णांच्या 58.4% आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 11,158 रुग्ण बरे झाले असून आंध्र प्रदेशात 8,772, कर्नाटकात 7,238 , तामिळनाडूत 6008, तर उत्तर प्रदेशात 4,597 कोविड रुग्ण बरे झाले आहेत.
वरील पाच राज्यांमध्ये मिळून गेल्या चोवीस तासात एकूण 536 मृत्यूची नोंद झाली असून देशभरात झालेल्या एकूण मृत्यूच्या संख्येच्या(819) तुलनेत हे प्रमाण 65.4% आहे. महाराष्ट्रात 184 मृत्यू नोंदवले गेले, तर कर्नाटकात 113 , त्याखालोखाल तामिळनाडूत 91, आंध्रप्रदेशात 85, तर उत्तर प्रदेशात 63 मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत भारताने 1.22 कोटी पेक्षा जास्त चाचण्या
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून आक्रमक चाचण्या हे ‘टेस्ट, ट्रॅक , ट्रीट’ या केंद्रप्रणित धोरणातील मार्गदर्शक तत्त्व आहे. उच्च स्तरावरील सातत्यपूर्ण तपासणीमुळे लवकर निदान होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते.
या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने भारताच्या एकत्रित चाचण्यांच्या संख्येने आज 4.3 कोटींचा (4,33,24,834) टप्पा पार केला आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल 1,22,66,514 चाचण्या घेण्यात आल्या.
राज्ये / केंद्रशासित प्रदेश त्यांची चाचणी क्षमता वाढवत आहेत. एकूण चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. एकूण चाचण्यांपैकी सुमारे 34% चाचण्या या तीन राज्यांनी केल्या आहेत. भारताच्या प्रतिदिन चाचणी क्षमतेने 10 लाख चाचण्याचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 10,16,920 चाचण्या घेण्यात आल्या.
सरासरी साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येमध्ये निरंतर वाढ झाली आहे. जुलै 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून साप्ताहिक सरासरी चाचण्यामध्ये 4 पटीने वाढ झाली आहे.
विस्तारित नैदानिक प्रयोगशाळा नेटवर्क आणि देशभरात सुलभ चाचणीच्या सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण (टीपीएम) लक्षणीयरीत्या वाढून 31,394 इतके झाले आहे.