मुंबईतही सकल हिंदू समाजाचा मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी

मुंबई ,२९ जानेवारी  / प्रतिनिधी :-पुण्यानंतर मुंबईमध्ये आज हिंदू सकल समाजाकडून हिंदू जण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्कमधून या मोर्चाची सुरुवात झाली. शिंदे गट आणि भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. यावेळी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मोर्चाचे नेतृत्व करत आहे.

महाराष्ट्रासह देशभरात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये लव्ह जिहाद प्रकरणात अडकलेल्या मुलींचे कुटुंब, आणि ज्यांची या प्रकरणामध्ये फसवणूक झाली अशा काही पीडित महिलांचाही या मोर्चात सहभाग होता. यावेळी, या मोर्चाचे नेतृत्व महिला करत होत्या. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. “जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है” , अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

गेल्या २ महिन्यात महाराष्ट्रात ४० हून अधिक हिंदू जनक्रोश मोर्चे निघाले, पण आजचा मोर्चा खूप मोठा असल्याचे सांगण्यात येतेय. महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करावा, अशी या संघटनांची मागणी आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण थांबवावे. अवैध इस्लामिक धार्मिक स्थळांवर कारवाई करावी. लँड जिहादवर कारवाई झाली पाहिजे, अशाही मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात आल्या.