गणरायाला शांततेत निरोप
मुंबई :गणपती बाप्पा मोरया।। पुढच्या वर्षी लवकर या।।
दर वर्षाच्या तुलनेत कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळाची संख्या फारच कमी होती. ढोल ताशे नाही. गर्दी नाही आणि गुलालांची उधळणही नाही.
कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी पालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव, फिरते कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध केली होती . कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गणेशोत्सव साजरा करताना विविध पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन यंत्रणांनी केले होते. परंतु, गणेश चर्तुथी आणि त्याआधीचे दोन-तीन दिवस बाजारात कमालीची गर्दी उसळली. त्याची पुनरावृत्ती गणेश विसर्जनाच्या दिवशी होऊ नये, यासाठी पोलीस, महापालिका प्रयत्नरत होते. त्यात त्यांना यश मिळाले.
१० दिवस मुक्काम करणाऱ्या गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला. कोरोनामुळे यंदा प्रथमच वेगळ्या नियमावलीत गणेशोत्सव साजरा करावा लागला. घरगुती गणेशमूर्ती दोन फूट आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार फूट उंचीची मर्यादा घालून दिली होती. विसर्जनावेळी नागरिक कुटुंबीयांसह मोठय़ा संख्येने सहभागी होतात. गर्दीत सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले जात नाही. काही जण मुखपट्टी परिधान करण्याचे तारतम्य बाळगत नाही.
विसर्जनावेळी एकाच वेळी गर्दी रोखण्यासाठी घरातच मूर्तीचे विसर्जन करावे,असे आवाहन करण्यात आले होते . या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. विसर्जन मिरवणूक नसल्याने पोलिसांचा ताण बराच कमी झाला . कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे यादृष्टीने यंत्रणा सजग होती.