औरंगाबादचे लोकसाहित्यिक प्रभाकर मांडे यांना पदमश्री पुरस्कार 

नवी दिल्ली ,२५ जानेवारी/प्रतिनिधी :-साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

लोकसाहित्य या अभ्यास शाखेला विद्यापीठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर अधिकाधिक ‘जाणतं’ करणाऱ्या संशोधकांच्या परंपरेत डॉ. प्रभाकर मांडे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या रूपाने त्यांनी महाराष्ट्रात या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांची मोठी फळी उभी केली.

लोकसाहित्य परिषद ही एक चळवळच महाराष्ट्रात सुरू झाली. त्याचे नेतृत्व मांडे यांनी केले आणि आजही करीत आहेत. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन, लोककला या विषयांचा अभ्यास अधिकाधिक शास्त्रपूत कसा होईल, याचा विचार डॉ. मांडे यांनी अभ्यासकांमध्ये रुजविला. लोकसाहित्याचे स्वरूप, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह, लोकगायकांची परंपरा, लोकरंगभूमी, मौखिक वाङ्मयाची परंपरा, लोकमानस रंग आणि ढंग, मांग आणि त्यांचे मागते, गावगाड्याबाहेर, लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी, कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी, अशा अनेक मौलिक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली व मानववंशशास्त्राच्या अंगाने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संशोधनात स्वतः असे सिद्धांतही तयार केले.

मराठवाडयातील औरंगाबाद जिल्ह्यात सावखेड हे गाव आहे. गोदावरीच्या काठी आणि अनेक मंदिरांच्या सहवासात असलेल्या या गावात क्षेत्रापाध्यायांच्या घरांपैकी मांडे सरांचे एक घराणे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयात डॉ. मे. पुं. रेगे यांचे मार्गदर्शन लाभले. १९६१ साली त्यांनी कलगीतुऱ्यावरचा आपला प्रबंध सिद्ध केला त्यावेळी त्यांना पुण्यात डॉ. इरावती कर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. डी. के. बेडेकर यांच्या विचारांचा प्रभाव मांडे सरांवर होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डिलिट् संपादन केलेल्या डॉ. मांडे यांनी तेथील मराठी विभागात प्रपाठक आणि विभागप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतानाच लोकसाहित्याच्या अभ्यासशाखा अधिक विकसित करण्याकडे भर दिला. किंबहुना लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांच्या मंडळीकरणाचे मोठे कार्य त्यांनी सुरू केले.

आधुनिकता आणि पारंपरिकता हा डॉ. मांडे यांच्या चिंतनाचा सातत्याने विषय राहिला आहे. आधुनिकता आपल्या जमिनीतूनच, पारंपरिक जीवनातूनच नव्याचा शोध घेऊन वर्तमानकालीन होण्याचा प्रयत्न करते. आपल्या जीवनाचे वास्तव कायम ठेऊन विरोधाचा स्वीकार करीत पुढे जाते. गतानुगतिकतेला विरोध, यथास्थितीला विरोध करून, विचार आणि बुद्धीची प्रतिष्ठा ठेवून समकालीन जीवनाच्या संदर्भात आपल्या जीवनशैलीला आकार देत असते. परंपरेला नवा अर्थ देऊन त्याला प्रासंगिक बनविण्याचा प्रयत्न करते. आधुनिकता ही एक परिवर्तनशील धारणा आहे. त्यात ऊर्जेचा अक्षय स्त्रोत असतो. आधुनिकतेचा शोध परंपरेपासून तुटून बाहेर जाऊन संभवतच नाही. परंपरेपासून बाजूला जाऊन आपण आधुनिकतेचा शोध घेऊ शेकत नाही, कारण आधुनिकता पारंपरिक बाबींतच स्वीकार आणि समन्वय या तत्वांच्या आधारे त्याला नवीन रूप देते. जसे झाडाला प्रतिवर्षी नवीन पालवी येते. जुनी पाने गळून पडतात. त्यासाठी झाडाचे अस्तित्व राखणे, त्याच्या आत मुळातून जीवनस्त्रोत कायम ठेवणे आवश्यक असते. मुळापासून तोडलेल्या आणि कापलेल्या झाडाला नवी पालवी फुटणे कधीही संभवत नाही. हे जसे खरे तसे परंपरेपासून तुटून आधुनिक होणे हेही संभवू शकत नाही. तसे घडले नाही तर जीवन उपरे बनते. खोटे आणि कृत्रिम बनते. त्यातील सृजनशीलता समाप्त होते. असेच काहीसे हिंदुस्थानातील पश्चिमीकरण झालेल्या अभिजनांच्या संदर्भात घडले असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर लोकपरंपरेत चालत आलेल्या लोककलांना आजचे रूप देऊन ते उपरे, स्वत्वहीन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा लोककलावंताचा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवणीची, आदानप्रदानाची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा तर या संदर्भात फारच जागरूक आणि सावध राहणे आवश्यक आहे.

लोकसंस्कृतीचे नाते एकाचवेळी वर्तमान आणि इतिहासाशी असते. या नात्याचा उलगडा अनेकवार आपल्या व्याख्यानांमधून डॉ. मांडे यांनी केला आहे. इतिहास हा केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नसतो. तो भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातील एक अर्थपूर्ण संवाद असतो. विशिष्ट इतिहासदृष्टी स्वीकारून केलेले घटनाक्रमांचे आकलन असते.

लोकगायकांची परंपरा या ग्रंथात प्रा. डॉ. प्रभाकर मांडे यांनी उपासनाप्रधान आणि रंजनप्रधान सादरीकरण करणाऱ्या लोकगायक परंपरांचा वेध घेतला आहे. पौराणिक आणि भेदीक कवने गाणाऱ्या लोकगायकांच्या स्वतंत्र परंपरांचे विश्लेषण त्यांनी ग्रंथात केले आहे. भारतात परकीय अंमल सुरू झाला तेव्हापासून आदिवासी आणि इतरेजन यांच्यातील अभिसरणप्रक्रिया खंडित झाली. पाश्चिमात्य शासकांनी केलेल्या कायद्यांमुळे स्वतःचे जमातविशिष्ट निराळेपण कायम राखून भारतीय जीवनप्रवाहाशी एकरूप असलेले आदिवासी एकूण राष्ट्रीय प्रवाहापासून अलग होऊ लागले. स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिकरणामुळे आणि विकास-प्रकल्पांमुळे निसर्गाशी एकरूप असलेली त्यांची जीवनसरणी प्रभावित झाली. या आणि अशा पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आदिवासींच्या प्रश्नांना डॉ. मांडे यांनी भारतीय आदिवासीः विकासाच्या समस्या या ग्रंथात वाचा फोडली आहे.

‘गावगाड्याबाहेर’, ‘लोकरंगभूमी’ हे डॉ. मांडे यांचे दोन मौलिक ग्रंथ असून लोकरंगभूमी या ग्रंथात त्यांनी विधिनाट्ये, भक्तिनाट्ये, तमाशा, खडीगंमतसारखे निखळ रंजनपर कलाप्रकार आदींचा वेध घेतला आहे. प्राचीन काळापासून भारतातील लोकजीवनात नाट्यमय आविष्कारांची परंपरा प्रचलित असल्याचे अनेक पुरावे आढळतात. रूढीविधीतील नाट्यमयतेमुळे त्यांचे स्वरूप लक्षणीय झाले आहे. आदिवासींच्या दंडार-भवाड्याच्या त्याचप्रमाणे पंचमी, ललित दशावताराच्या रूपाने लोक देवतावतरणाचा अनुभव शतकानुशतके घेत आहेत. निरनिराळया देवतांच्या भगत मागत्यांची कुलाचारांच्या स्वरूपात त्यांची विधिनाट्ये विकसित केली आहेत. कथाकथन-गाण्यांतील तसेच लोकखेळातील नाट्यमयतेने त्यांचे स्वरूप आकर्षक झाले आहे. विविध स्वरूपी पथनाटयरूप कलाविष्कारांनी पारंपरिक जीवन समृद्ध केले आहे. रंजनप्रधान लोकनाटयाच्या परंपरेनेही लोकजीवनात रंग भरला आहे असे डॉ. मांडे यांना वाटते. महाराष्ट्राच्या लोकरंगभूमीवरील या निरनिराळया प्रकारांच्या तसेच परप्रांतातील नाट्याविष्कारांच्या स्वरूप-लक्षणांची चर्चा या ग्रंथात करण्यात आली आहे.