राष्ट्रीय मतदार दिवस हा लोकशाहीच्या जागराचा सोहळा –  फ.मु.शिंदे

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

औरंगाबाद,२५ जानेवारी / प्रतिनिधी :-   भारताची लोकशाही राज्य घटनेवर आधारीत असून   लोकशाहीत मतदार हा अत्यंत महत्त्वावाचा घटक असल्याने मतदार दिन हा लोकशाहीच्या जागराचा सोहळा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी साहित्यिक फ.मु.शिंदे यांनी केले.

            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या सभागृहात नवमतदारांचा सन्मान तसेच मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या मतदार नोंदणी अधिकारी, समाजिक संस्था, महाविद्यालयींन विद्यार्थी तसेच विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज संपन्न झाले.

            या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी भारत कदम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदिवे, उपविभागीय अधिकारी जर्नादन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे, तहसिलदार संजय वरकड, तहसिलदार शितल राजपुत यांच्यासह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

            लोकशाही मध्ये समानता, हक्क आणि कर्तव्य हे नागरिकांना घटनेने बहाल केलेले असून यांचा वापर लोकशाही टिकवण्यासाठी केला पाहिजे. मतदार दिनानिमित्त काव्यमय, विनोदी शैल्लीत विविध उदाहरणावरुन फ.मु.शिंदे यांनी मतदारांनाही मागदर्शन केले.

            डॉ.अनंत गव्हाणे यांनी लोकशाहीचे महत्व अबाधित राहण्यासाठी मतदारांनी मतदानांचा हक्क बजावावा याच उद्देशाने हा मतदार दिन उत्सवाचा असून लोकशाहीला बळकटी देणारा आहे. भारतीय स्वातंत्र्य हे आपल्या राज्यघटनेमुळे अबाधित राहिले आहे. तरुणांनी जबाबदारीने व जागृकतेने मतदान करुन लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी केले.

            उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदिवे यांनी प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची  माहिती दिली. महाविद्यालयात युवकांमध्ये एकसंघ भावना निर्माण करण्याबरोबरच मतदानास प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांगितले.

            उपजिल्हाधिकारी भारत कदम यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रास्ताविक करुन विविध स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांने सजकतेने तसेच जबाबदारीने मतदान केल्यास लोकशाही व्यवस्थेला पाठबळ मिळते असे सांगितले. याबरोबरच प्रत्येकाने मतदान करुन आपले कर्तव्य निभावले पाहिजे. यावेळी उपस्थितींना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली.

            महिला मतदांराची नोंदणी करण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या मानसी झोंड पाटील यांच्यासह एम.जी.एम महाविद्यालयाचे श्रीकांत मापारी आधार प्रमाणीकीकरणात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन बाबत पत्रकार विजय चौधरी दै.महाराष्ट टाइम्स, नवनाथ ईधाते दै.सकाळ, नावीद शेख यांच्यासह तृतीय पंथीयाची मतदार नोंदणी करणारे अल्ताफ शेख तसेच विविध महाद्यिालयात घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण  कार्यक्रमात करण्यात आले. यामध्ये कला महाविद्यालय बिडकीन- रांगोळी स्पर्धा, डॉ. रफिक झकेरिया महाविद्यालय – पोस्टर स्पर्धा, सरस्वती भुवन महाविद्यालय- पथनाट्य यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.