शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण; काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबई ,२२ जानेवारी  / प्रतिनिधी :- २३ जानेवारीला शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जाते. यादरम्यान, विधिमंडळात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने येणार का? याची जास्त चर्चा रंगली आहे. तसेच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा भाजप हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली. तर, आदित्य ठाकरे यांनीदेखील या कार्यक्रमाबद्दल आपले मत स्पष्ट करत शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, “माझे आजोबा विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे. एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे” असा टोला त्यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, “एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे गेले. जेवढे ते खालच्या पातळीवर जातील, तेवढे आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत. कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात? तुम्ही असे काय खाल्ले होते, की जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावे लागले? ही टोळी उद्योगांमध्ये घुसल्यानंतर आपले काही खरे नाही, म्हणून उद्योग राज्याबाहेर जात आहेत.” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

२३ जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहे ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच, विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार असून अनेक नेते यासाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आमंत्रण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र उद्धव ठाकरे यांनाही देण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याहस्ते त्यांना आमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार का? असा प्रश्न सर्वानांच पडला होता. यावर संजय राऊत यांनी, हा भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्याने उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.