भारतात जूननंतर आर्थिक मंदी येणार : केंद्रीय मंत्री नारायण राणे

पुणे,१६ जानेवारी / प्रतिनिधी :-भारतात आर्थिक मंदी जून नंतर अपेक्षित आहे, असे विधान केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. पुण्यात आज जी-२० परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राणे म्हणाले, “जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये मंदी आहे. भारतात आर्थिक मंदी जून नंतर अपेक्षित आहे पण त्याची झळ सामान्य नागरिकांना बसू नये यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे”.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यानंतर भारत पाचव्या क्रमांकावर येण्याच्या प्रयत्नात आहे, असेही राणे म्हणाले.

नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की जी २० ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत.

“शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. यावर देखील नारायण राणे यांनी भाष्य केले. कोणतेही उद्योग बाहेर जात नाही आहेत. या मिस गाईड करणाऱ्या बातम्या आहेत. जे राज्य करात सवलत देतात. तिथे बाहेरच्या कंपन्या येऊन गुंतवणूक करतात. देशाच्या इतर भागापेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत. त्यामुळे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जातात पण ते परत येतात. माझ्या जवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रिपद आहे. उद्योग महाराष्ट्रात आणण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०० कोटीचा ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यात येईल, असे नारायण राणे यांनी सांगितले.