किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

इक्बालसिंह चहल मातोश्रीचे की मुंबई महापालिकेचे आयुक्त? हिसाब तो देना पडेगा…!

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल हे मातोश्रीचे आयुक्त आहेत की मुंबई महापालिकेचे हे अजूनपर्यंत समजलेले नाही, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इक्बालसिंग चहल यांच्या ईडी चौकशीवरुन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे.

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावर किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत हिसाब तो देना ही होगा म्हणत इशारा दिला आहे. कोरोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या कोरोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. अस्तित्वात नसलेल्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी ५-५ कोविड सेंटर्सचे १०० कोटींचे कंत्राट दिले. मी याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. मुंबई पोलिसांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हाही दाखल केला होता. मात्र, त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्लाब चहल यांनी १४० दिवस कोणतेही पेपर तपास यंत्रणांना दिलेले नाहीत.

किरीट सोमय्या पुढे बोलताना म्हणाले, आता चहलको हाजिर होना पडेगा. ते कागदपत्र माझ्याकडे आहेत. इक्बालसिंग चहल यांच्या सहीने हे कंत्राट देण्यात आले होते. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर यात अनेक अधिकारी अडकतील. लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप त्यांनी केले आहे. हिशोब घेऊनच राहणार मुंबई महापालिका, उद्धव ठाकरे यांचा हिशोब घेऊनच राहणार.