एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आजच होणार ; इतक्या कोटींचे झाले वितरण

एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड जाणार असून रखडलेल्या पगाराबाबत मोठी घोषणा

मुंबई ,१३ जानेवारी  / प्रतिनिधी :- एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड जाणार आहे. कारण, राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मोठा निर्णय घेतला. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे, आजच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतीत एक परिपत्रक काढत याबद्दल माहिती दिली. तत्पूर्वी, याही महिन्यामध्ये पगार आला नसल्याने १४ जानेवारीला एसटी कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत होते. मात्र, राज्य शासनाने परिपत्रक काढून त्यांना दिलासा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार असून ग्रॅज्युइटी, पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रणित एसटी संघटनेचे म्हणणे आहे की दिलेली रक्कम ही अपुरी आहे. एसटी संप काळात राज्य सरकारने न्यायालयात आश्वासन दिले होते की, कर्मचाऱ्यांचे पगार हे ७ ते १० तारखेदरम्यान होतील. मात्र, तरीही वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले होते. अखेर परिपत्रक काढून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला.

 पीएफ, ग्रॅज्यूएटी आदी देणी रखडणार

 मात्र हा निधी अपुरा आहे. यातून कामगारांचे नुकसानच असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढतच असून महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातच महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी २०२१च्या दिवाळीपासून संप सुरू केला. तो प्रचंड लांबल्याने आणि त्याआधी कोरोनासंकट त्यामुळे महामंडळ आणखीनच अडचणीत आले आहे. संपकाळात न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीसमोर वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते ११तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारच्यावतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची १२ तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.

त्यातच सरकारने आज फक्त ३००कोटी रुपयांचा निधी महामंडळाला दिला असून तो अपुरा असल्याने त्यातून फक्त वेतन होणार आहे. पीएफ, ग्रॅज्युटी व बँक कर्ज ही देणी प्रलंबित राहणार असून त्यामुळे सरकारने पुन्हा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप बरगे यांनी केला.