पंतप्रधानांना हे शोभत नाही:राज ठाकरेंची मोदींवर थेट टीका

पिंपरी चिंचवड , ८ जानेवारी  / प्रतिनिधी :-   “महाराष्ट्र हे सर्वार्थाने एक श्रीमंत राज्य आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्याने राज्याचे फार नुकसान होणार नाही. पण, फक्त आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही.” असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित १८व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये झालेल्या जाहीर मुलाखतीमध्ये बोलत होते. यामध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपले परखड मत मांडले.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, “देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याकडे समान बघितले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणे योग्य नाही. चांगल्या कामाचे कौतुकही केले पाहिजे. पण, एखाद्या चुकीच्या भूमिकेला राजकारणात विरोध करणे चुकीचे नाही. यापूर्वीही मी सरकारच्या चांगल्या कामाचे अभिनंदन केले आहे. जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणणार आणि जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार, मी सरळ विचार करणारा आहे. महाराष्ट्र हे राज्य श्रीमंत आहे. त्यामुळे जे आहे ते टिकवले तरी राज्य अग्रेसर आहे. दुसरा उद्योग बाहेर गेला तरी काही फरक पडत नाही.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मी कडवट मराठी घरात जन्म घेतला आहे. त्यामुळे मी फारकत घेणे शक्य नाही. आता पाकिस्तानी कलावंताना ज्यावेळी हाकलून दिलं. त्यावेळी सो कॉल्ड हिंदुत्वावादी कुठे होते. लाथा आम्ही घातल्यात ना. परत नाही ना आले. आता परतही चित्रपटही प्रदर्शित करायचं ठरवलं, विरोध केल्यानंतर भारतात बंद झाला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

‘व्यंगचित्र’ विषयावर राज ठाकरेंनी व्यक्त केले आपले मत

मुलाखती दरम्यान राज ठाकरेंना २०१८-१९ नंतर व्यंगचित्र का काढली नाहीत? असं प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “मला व्यंगचित्र काढल्यानंतर ते सोशल मीडियावर टाकणे आवडत नाही. मी सुरुवातीला प्रिंट मीडियामध्ये काम केल्यामुळे वृत्तपत्रात छापून येणाऱ्या व्यंगचित्राची जी मजा आहे, ती सोशल मीडियावर नाही. एकदा मला कोणीतरी व्यंगचित्राखाली लोकांनी केलेल्या कमेंट दाखवल्या होत्या. त्याखाली अनेकांनी ‘जय मनसे’, ‘जय महाराष्ट्र साहेब’ अशा कमेंट केल्या होत्या. पण त्याला व्यंगचित्र कळतं का? असा प्रश्न मला पडतो. तसेच, हल्ली सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता यावर पैसे आकारायला हवे. त्यामुळे किमान व्यक्त होणे तरी कमी होईल” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.