माझ्यासाठी राज्यपाल पद अयोग्यच; भगतसिंग कोश्यारींची खदखद

मुंबई ,८ जानेवारी  / प्रतिनिधी :- गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे त्यांच्या विधानांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर अजूनही राज्याचे राजकारण तापलेले आहे. अशामध्ये त्यांनी, माझ्यासाठी राज्यपाल हे पद अयोग्यच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांनी राज्यपाल पद सोडण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आल्या. मात्र, आता खुद्द भगतसिंग कोश्यारींनीच यासंदर्भात आपली खातं व्यक्त केली आहे.

शुक्रवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, “राज्यपाल बनणे म्हणजे दु:खच दु:ख आहे. यामध्ये कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटते की मी चुकीच्या ठिकाणी आलो. पण मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो”, अशी मनातील खदखद त्यांनी व्यक्त करून दाखवली.