सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

विद्यार्थी, पालक, सर्व कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी चर्चा करून निर्णय

मुंबई, दि. २८ : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले,सर्व अकृषी विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देऊन कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांच्याशीसुद्धा याबद्दल सविस्तरपणे चर्चा करून विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचे कसलेही खच्चीकरण होणार नाही, आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्य शासन निर्णय घेईल असेही श्री. सामंत यांनी संगितले.

श्री. सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता,कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परीक्षेसंदर्भात बाजू मांडण्यात आली होती.

तसेच या वर्षापासून उच्च न्यायालयाने आदेशित केल्याप्रमाणे सीजीपीए ( CGPA) पद्धतीने निकाल जाहीर करून पदवी देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचे हित त्यांची मानसिक स्थिती आणि राज्यातील कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर घेतला होता.

श्री. सामंत म्हणाले, परीक्षेसंदर्भातील कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य ,प्राध्यापक, पोलीस व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाने कोविड-१९ संदर्भात दिलेल्या सर्व सुरक्षिततेचा प्रोटोकॉल व नियमांचे पालन करुन परीक्षा कशा घेता येतील याबाबत सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत सर्वांगीण विचार करून परीक्षा कधी, कशा व कोणत्या पद्धतीने विद्यापीठ परीक्षा घेईल या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *