जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी १३१३ नवीन पदे निर्माण करणार – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

नागपूर ,२८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-राज्यामध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुमारे १ हजार ३१३ नवीन पदे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत केली

निवेदनात मंत्री श्री. पाटील म्हणाले, “यापूर्वी उप अभियंता संवर्गातील २०७ पदांपैकी १८२ पदांची व कनिष्ठ अभियंता संवर्गातील १ हजार १७२ पदांपैकी १ हजार ९४ पदांची वाढ करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये दोन-तीन तालुक्यांकरिता एक उप अभियंता कार्यालय होते. आता प्रत्येक तालुक्याला उप अभियंता कार्यालय देणार आहे. १७३ ऐवजी १८३ उप अभियंता कार्यालय होणार आहे. जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग अधिक मजबूत होणार असून जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती मिळणार आहे”, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.