सीमाप्रश्नाबाबत आज विधीमंडळात ठराव आणणार! -मुख्यमंत्री

आम्हाला मान खाली घालावी लागेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही’

नवी दिल्ली : कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापले आहे. कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज विरोधकांकडून तशी मागणीही जोरात केली गेली. यानंतर सीमाप्रश्नाबाबत ठराव आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. हा ठराव आज विधिमंडळात मंजूर केला जाईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरी भेट घेतली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन दिल्लीला आलो होतो. मुख्यमंत्री म्हणाले की, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत. हा विषय ६० वर्षांपासूनचा आहे. असे असताना कोर्टातील प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हव्या. जे आज बोलत आहेत त्यांनी सीमाभागातील लोकांच्या योजना बंद केल्या. टीका करणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावे. आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत, असेही ते म्हणाले.

‘आम्हाला मान खाली घालावी लागेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही’उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावरून आरोप करणाऱ्या विरोधकांना विधानसभेत सुनावले. जसे कर्नाटक म्हणतेय, तसेच आपणही इंच इंच लढू. सर्वोच्च न्यायालय असेल किंवा केंद्र सरकार असेल, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

कर्नाटकविरोधात आपला ठराव आणण्याचे ठरले होते. मागच्या आठवड्यातले वातावरण जरा गंभीर होते. त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आणण्याचा निर्णय होता. पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण आले आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला गेले आहेत, ते दुपारी परणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारपर्यंत येतील. शक्य झाल्यास आज संध्याकाळी नाहीतर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचे सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ठराव आणला आणि कारण नसताना सीमावाद चिघळला, अशी टीका अजित पवार यांनी केली. परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका, असा गंभीर इशारा महाराष्ट्राने दिला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या विषयावर सभागृह एक आहे. आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचे नाही, आपल्याला एक राहायचे आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या गदारोळावर स्पष्ट केले.