दौलताबाद किल्ला परिसरातील अतिक्रमणे ३१ डिसेंबर पर्यंत हटवण्याचे आदेश

औरंगाबाद,२२ डिसेंबर / प्रतिनिधी :- दौलताबाद किल्ला परिसरातील अतिक्रमण धारकांनी 31 डिसेंबर पर्यंत स्वतः हून अतिक्रमणे काढून घ्यावीत नसता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.

            शहरात होणाऱ्या जी -२० परिषदेच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी आणि पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी बिबी का मकबरा परिसर, दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमणाची पाहणी करून लवकरात लवकर अतिक्रमण काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

            वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमण काढून त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत नियोजन करावे, येथील पर्यटन महामंडळाच्या  मालकीच्या असणाऱ्या पार्किंगमध्ये वाहने लावण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

            यावेळी वेरूळ येथून जाणाऱ्या बायपासच्या जागेची देखील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.