आज मविआ विरुद्ध भाजप संघर्ष!’मविआ’च्या महामोर्चाला परवानगी दिली

मविआचा मोर्चा तर भाजपकडूनही मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार

मुंबई ,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :-मुंबईत  आज  महापुरुषांच्या वक्तव्याविरोधात मविआकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. तर त्याला उत्तर म्हणत भाजपकडून आशिष शेलार यांनीही मुंबईभर माफी मांगो निदर्शने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे  आज  भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडी १७ तारखेला भव्य मोर्चा काढणार आहे. यासाठी आता परवानगी मिळाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचनादेखील दिल्या आहेत. ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चाला परवानगी द्यायला काहीही अडचण नाही. पण, मोर्चा हा शांतपणेच व्हायला हवा. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलने, मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. सरकार म्हणून आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट पाळली जाईल हेच पाहू.”

शनिवारी, १७ मार्चला निघणाऱ्या महामोर्चासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी तब्बल अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. महामोर्चाच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून २ अतिरिक्त पोलिस आयुक्त तर ४-५ पोलिस उपायुक्त उपस्थित असणार आहेत. तर, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण मोर्चावर लक्ष ठेवले जाणार आहे. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संरक्षणासाठी तब्बल दीडशे सुरक्षा रक्षकांची टीम तयार केली आहे.

पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाबद्दल बोलतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत आहेत. यांच्याविरोधातही संताप व्यक्त करण्यात येत आहे. तोही व्यक्त करावाच लागेल. त्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.”

भाजपकडूनही मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार

संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत. राऊतांकडून नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे गटाकडून हिंदू देव-देवतांची टिंगल टवाळी केली जात आहे. दलित समाजाला आंबेडकरांनी आवाज दिला, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य केली जाताहेत, हे दुर्दैवं आहे. महापुरुषांबद्दल बोलायला यांची हिंमत कशी होते. याप्रकरणी आता राऊत कधी माफी मागणार? असा सवाल शेलार यांनी केला.

”बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला” असे संजय राऊत म्हणाले आहेत. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळे विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवले आहे. अशातच सुषमा अंधारे यांच्याकडूनही दैवतांचा अपमान सुरू आहे. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे शांतच आहेत, असा टोला लगावताना उद्याचा मोर्चा कशाला करताय, असा टोलाही शेलारांनी लगावला. या सर्व वक्तव्याविरोधात उद्या भाजपकडूनही मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार असल्याचेही शेलारांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहास संजय राऊत यांनी वाचावा, असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले. तसेच भाजपचे नेते आमदार भाई गिरकर यांनी राऊतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनी वाचावी म्हणून दोन पुस्तके पाठवली आहेत, असा चिमटाही पत्रकार परिषदेत काढला.

संजय राऊत हे त्यांचे अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाही, असे म्हणताना संजय राऊत यांच्या डॉक्टर आणि कंपाऊडर यांच्या किस्सा आणि WHO सल्लागार कोण असू शकतात असे म्हणतानाच आता यांची मस्ती आणि मिशाद बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थळाबद्दल भ्रम निर्माण करण्यापर्यंत गेली आहे. खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चूक आहे, या पद्धतीने खोटे पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय, संविधानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिला हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहे का, असा उलट सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला याबद्दल वाद निर्माण करण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक असल्याचा गंभीर आरोपही शेलारांनी केला. या वादामुळे आंबेडकर प्रेमींवर अफगाणी संकट आले आहे. तालिबानी भागामध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमेवर हल्ला झाला, हे आम्ही पाहिले आहे. आता शांततापूर्व पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंची शिवसेना का करते आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेलार म्हणाले की, हे सगळे झाल्यावरही संजय राऊत यांनी माफी मागितली नाही. ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला, त्यांच्यासोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पुढचे पाऊल टाकत जन्म स्थळाचा वाद निर्माण केला आहे. याचा भाजपकडून निषेध करतो. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही शेलारांनी म्हटले आहे.

मला खात्री, केंद्राला ‘त्यांच्या’विरुद्ध कारवाई करावीच लागेल; असं का म्हणाले शरद पवार?

राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या महामोर्चा परवानगी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “महाविकास आघाडीचा मोर्चा हा सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल.” तसेच, “राज्यपालांनी ज्या पद्धतीचे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल.” असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शविला.

शरद पवार यावेळी म्हणाले की, “मोर्चासाठी परवानगी मिळाली याबाबत मला आश्चर्य वाटत नाही. कारण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची बघ्याची भूमिका आहे, याबद्दल नागरिकांच्या मनात संताप आहे. मी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐकलं होतं, ते म्हणाले होते मोर्चा हा लोकशाहीत अधिकार, त्यामुळे परवानगी मिळेल यात शंका नव्हती. डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत जबाबदार माणसांनी केलेली वक्तव्ये सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया सर्वांना मुंबईच्या महामोर्चामध्ये दिसेल.”