बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी:सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली,१६ डिसेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर परवानगी दिली आहे. यामुळे बैलगाडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

बैलगाडा शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्याचे बैलगाडाप्रेमींना आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता झाली असून या निर्णयामुळे मी समाधानी असून आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी तसेच ॲड. सचिन पाटील यांनी युक्तिवाद केला. मंत्री केदार म्हणाले, गेल्या ४ वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद होती. बैलगाड्याच्या शर्यती हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, या निर्णयाने ते आनंद व्यक्त करीत आहेत.

सर्वोच्च न्यायालय यांनी २०१४ मधील आदेशातील तरतुदीचा विचार करून तसेच राज्याने २०१७ साली बैलगाडा शर्यतीबाबत केलेला कायदा व त्या अंतर्गत गठीत नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अधीन राहून महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू राज्यासाठी समान न्याय गृहीत धरून बैलगाडा शर्यतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून राज्य शासनाने बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत १९६०चा कायद्याला अनुसरून जी नियमावली केली आहे, त्या नियमावलीला अधीन राहून बैलगाडा शर्यती सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचे केदार यांनी सांगितले.

पुण्यात बैलांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

न्यायालयाच्या निर्णयाचा जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक पुणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी आपल्या गोठ्यातील गाडा बैलांची वडगाव मावळ येथे मुख्य बाजारपेठेतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली तसेच सर्व बैलगाडा शौकीन यांना लाडू भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गाडामालक, बैलगाडा शौकीन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.