जी-20 परिषदेच्या तयारीत  नागरिकांचा सहभाग महत्वाचा– जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

औरंगाबाद,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-  जी-20 राष्ट्रसमुह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यासह शहराची विविधता दाखविण्याची एक संधी आहे. जी-20 परिषदेची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून या मध्ये नागरिकांचाही सहभाग महत्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी या निमित्ताने ‘चला शहर घडवूया ‘ या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज केले.

जी-20 शिखर परिषदेचे प्रतिनिधी  13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर विविध स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आज आढावा घेतला.  यावेळी मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय म्हणाले, जी-20 परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद महानगराला प्रदर्शित करण्याची संधी मिळत आहे. जागतिक पातळीवर महानगराची वेगळी ओळख होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून परिषदेच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरू असून यामध्ये महानगरातील नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी ‘ चला शहर घडवूया ‘ या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यायचा आहे. यामध्ये  नागरिकांनी आपले घर तसेच परिसर स्वच्छ ठेवणे, घराची रंगरंगोटी करणे, दिवाळीप्रमाणे घराला विद्युतीकरण करणे तसेच आपल्या सोसायटीचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करू नये, सिग्नलचे पालन करणे,  शासकीय समाज माध्यमे फॉलो करणे, रिपोस्ट करणे, सकारात्मक पद्धतीने शहराची ओळख करुन देणे यासोबतच ऐतिहासिक स्थळांबाबत छोटीशी चित्रफीत, पोलीस, सफाई कामगार तसेच समाजपयोगी उपक्रमांबाबत व्हिडीओ (shor Reals)करुन समाज माध्यमांवर पाठविणे या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.  सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून जी-20 परिषदेच्या निमित्ताने शहराचेही ब्रॅडींग होण्यास मदत होणार आहे असेही ते म्हणाले.

शासकीय कार्यालयांचेही सौंदर्यीकरण महत्वाचे असून इमारतीवर विद्युतीकरण, सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी, विमानतळावरून बाहेर पडताना वाहनांचे नियोजन, जी-20 परिषदेच्या निमित्ताने नियंत्रण कक्ष, नियोजनाबाबत पुस्तिका, जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच सांस्कृतिक पंरपरेचे तसेच औद्योगिक व पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच सर्व सोईसुविधा याबाबतचे नियोजन काटेकोरपणे करा, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिल्या.

जी-20 परिषदेचे सहभागी प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा येथील सोईसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणी पुरवठा, आदी व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.