औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

मुंबई ,१ डिसेंबर  / प्रतिनिधी :-औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

बैठकीस सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थींना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे बँकांना आवाहनही करण्यात आले असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत. ही योजना राबविताना तेथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही बारकाईने विचार करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

या योजनेच्या सद्य स्थितीसंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. तसेच, योजनेस गती देण्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली.