ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल म्हणून नेमले जाते का?-उद्धव ठाकरे

महाराष्ट्र बंद करू, असं का म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई ,२४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली मते व्यक्त केली आहेत. “ज्यांचे सरकार केंद्रात आहे, त्यांच्या विचारसरणीच्या माणसांची निवड केली जाते. मग, त्यासाठी कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल म्हणून नेमले जाते का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.

पुढे केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी म्हंटले की, “केंद्राने हा नमुना राज्यातून परत घेऊन जावा नाहीतर त्यांना महाराष्ट्रांचा इंगा दाखवला जाईल” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र बंदचा इशारादेखील दिला. पुढे ते म्हणाले की, ” त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल. राज्यपाल पदावर बसणारी व्यक्ती ही निष्पक्ष असावी. राज्यात काही पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याची सोडवणूक करणारी असावी. पण, आपल्या राज्याचे राज्यपाल हे काहीही वबोळात असतात. त्यांनी जी काही वक्तव्य केली आहेत, ती गांभिर्याने घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाण्यामध्ये मराठी लोकांचा अपमान केला, सावित्रीबाई फुलेंबद्दलही चुकीचे वक्तव्य केलं. आता शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. आता राज्यात मिंधे सरकार आल्यापासून कुणीही यावे आणि टपली मारुन जावे अशी अवस्था झाली आहे”