वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न सरकार दरबारी
२१ डिसेंबर रोजी मंत्रालयावर ( मुंबई )भव्य मोर्चा
औरंगाबाद, २३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रशासन, कंत्राटदाराच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नावर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांच्या कडे वाचा फोडली.कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा २१ डिसेंबर रोजी मंत्रालयावर ( मुंबई )भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.
वीज उद्योगात रिक्त पदांवर सातत्याने व नियमितपणे कंत्राटी कामगार गेल्या १५-१६ वर्षांपासून सातत्याने व नियमितपणे कार्यरत आहेत. या कामगारांना किमान वेतन व २० % वेतन वेळेवर देण्यात यावे, कंत्राटदार कामगारांच्या वेतना मधुन विविध नावा खाली कामगारांच्या कडून दरमहा पैशाची मागणी करणे, पैसे न देणाऱ्या कामगारांवर बेकायदेशीर पणे कारवाई करून कामावरून कमी करणे, आकसापोटी त्यांची दूर अंतरावर बदली करणे. पी एफ व इएसआयसी बाबतीत अनियमितता , कुठल्याही कायद्याला न जुमानण्याची प्रशासन व कंत्राटदारांची प्रवृत्ती, कंत्राटदार बदलल्यावर पुन्हा कामगार कामाला घेण्यासाठी हजारो रूपयांची मागणी करणे, नोकरीत संरक्षित कामगारांना कामावर न घेणे, दिवाळी बोनस रक्कम ,ई प्रशासन पातळीवर प्रश्नांबाबतीत २१ नोव्हेंबर रोजी कामगार उपायुक्त यांच्या समावेत त्रिपक्षीय बैठक झाली.
या वेळी संघटनेने या वेळी धोरणात्मक बाबतीत डीबीटी व्दारे वेतन,ओडिसा,हरियाणा सरकारने घेतलेले निर्णय, कंत्राटदार मुक्त रोजगार, नोकरीत स्थैर्य, या बाबतीत सविस्तर माहिती देवून अशी योजना महाराष्ट्र सरकारने घेवून महाराष्ट्र राज्यातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. २१ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे आयोजित भव्य मोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री खरात यांनी केले आहे.
या वेळी कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत,सहाय्यक कामगार आयुक्त पडियाल, कामगार अधिकारी अमोल जाधव, महावितरण प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद प्रादेशिक संचालक कार्यालयाचे सह उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील,महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, सह संघटन मंत्री तात्यासाहेब सावंत, सुशील उपळकर,अन्सार खान, अशोक खंडागळे,माधव हिवराळे,यशवंत दिपके, रवी साखरे व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.