महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

नवी दिल्ली,२१ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणाऱ्या  महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना सन 2021-22 च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने नुकतेच ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ प्रदान  करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्रातील  तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्ल‍िश मीडियम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्ल‍िक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संबंधित शाळांचे विद्यार्थीही प्रतिनिधिक स्वरुपात पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्यांसोबत  उपस्थित होते.

            या पुरस्कारांतर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हात धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-19 च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मूल्यांकन झाले.

            केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे सन 2016-17 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. सन 2021-2022 च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी  देशभरातील एकूण 39 शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये 34 विद्यालयांची निवड तर उपश्रेणींमध्ये 5 विद्यालयांची निवड करण्यात आली. या अंतर्गत 17 प्राथमिक आणि 22 माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. तसेच निवड झालेल्या विद्यालयांमध्ये 21 शाळा ग्रामीण भागातील तर 18 शाळा या शहरी भागातील आहे. या विद्यालयांमध्ये 28 शाळा अनुदानित, 11 शाळा खाजगी, 2 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, 1 नवोदय विद्यालय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे.

            सर्वसमावेशक श्रेणीमधील 34 विद्यालयांना 60 हजार रूपये रोख तर उपश्रेणीतील 5 विद्यालयांना 20 हजार रूपये रोख तसेच प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.