राज्यात डिसेंबरपर्यंत एक लाख कृषिपंपांना वीजजोडणी देण्याचा निर्धार – संचालक (संचालन) संजय ताकसांडे

औरंगाबाद : पैसे भरून प्रलंबित असलेल्या राज्यातील एक लाख कृषिपंपांना डिसेंबर २०२२ पर्यंत वीजजोडणी देण्याचा महावितरणचा निर्धार असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.
            शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद परिमंडल व अहमदनगर मंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता श्री.प्रकाश जमधडे (औरंगाबाद शहर) , श्री. प्रवीण दरोली (औरंगाबाद ग्रामीण), श्री.अर्शदखान पठाण (जालना), श्री.सुनील काकडे (अहमदनगर), श्री. मोहन काळोगे (स्थापत्य) यांची प्रमुख उपस्थिती होती.
     यावेळी संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले की, एक लाख कृषिपंपांना वीजजोडणी देण्याच्या उद्दिष्टानुसार महावितरणकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३० मीटर अंतरापर्यंतच्या प्रलंबित वीजजोडण्या येत्या २४ तासात देण्यात याव्यात. तसेच ३१ ते २०० मीटर अंतर असलेल्या प्रलंबित कृषिपंप वीजजोडणीसाठी उपलब्ध असलेल्या आकस्मिक निधीच्या कामाचे शंभर टक्के आदेश काढण्यात यावेत. कृषी आकस्मिक निधी कसा वाढविता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच २०१ मीटर ते ६०० मीटर अंतरातील प्रलंबित वीजजोडणीसाठी जिल्ह्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वीजजोडणीच्या कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सुचक इशारा यावेळी त्यांनी दिला.
         महावितरण आर्थिक संक्रमणाच्या काळातून मार्गक्रमण करत असल्याने ग्राहकांना खात्रीशीर वीजपुरवठा करण्यासह वितरित केलेल्या वीजबिलाची वसुली करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. विद्युत यंत्रणेची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करणे, रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करणे, जास्त वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वितरण हानी दिलेल्या उद्दिष्टानुसार कमी करणे, मागणीनुसार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे आणि त्यानुसार काम करण्याचे निर्देश देताना कामात निष्काळजीपणा आढळल्याने पाच उपकार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.
    यावेळी श्री.ताकसांडे म्हणाले की, सद्यस्थितीत वीज मीटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पुढील काळात आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त मीटर बदलावेत आणि अचूक बिलिंग करावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले.
   कंत्राटदारांना महावितरणच्या कृषिपंप जोडणी निर्धारात सहभागी होण्याचे आवाहन
         महावितरणचे काम करणारे कंत्राटदार महावितरणच्या व्यवस्थेचा भाग आहेत. शिवाय त्यांचा कॉस्ट डाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदारांनीही महावितरणच्या एक लाख कृषिपंप वीजजोडणीच्या निर्धारात सामील होऊन वीजजोडणी लक्ष्य पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी कंत्राटदारासोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी केले.     या आढावा बैठकीला परिमंडल कार्यालयातील सर्व विभाग प्रमुखांसह औरंगाबाद, जालना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते उपस्थित होते.