स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक जनतेला प्रेरणादायी; स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दादर येथील महापौर बंगला परिसरात सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीस मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, माजी मंत्री रामदास कदम, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून मार्च २०२३ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल. बाळासाहेबांच्या स्मारकातून जनतेला प्रेरणा मिळणार असून त्यासाठी त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जनतेचे असून ते लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला हे स्मारक समर्पीत करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या महापौर निवासस्थानाचे वारसा संर्वधन व जतन करणे, प्रवेशद्वार इमारतीचे बांधकाम, इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम इ. कामे प्रगतीपथावर आहेत. या स्मारकाच्या पहील्या टप्प्यातील ५८.३५ टक्के काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामांना नुकतीच सुरुवात झाली आहे, असे श्री. श्रीनिवास यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.