ठोंबरेंच्या पक्ष प्रवेशाला चिकटगावकरांचा विरोध

पर्याय खुले – माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर

हे तर आ. चव्हाणांचे षडयंत्र.. ! दगाबाजांना पक्षात घेऊन काय साध्य होणार – चिकटगावकर

वैजापूर, १६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आपल्या समर्थकांसह मतदारांमध्ये जाऊन ठोंबरे यांच्या प्रवेशाबाबत येत्या पंधरा दिवसात त्यांची मते जाणून घेणार असल्याचे सांगितले. मतदारांना ठोंबरे यांचा पक्षप्रवेश मान्य नसल्यास आपल्यासाठी शिंदे सेना सोडून उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपा. एमआयएम व बहुजन समाज पक्षाचे पर्याय खुले आहेत असे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर चिकटगावकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकर पवार, रिखबदास पाटणी, मंजाहरी गाढे, राजेंद्र मगर, प्रशांत शिंदे, प्रेम राजपूत, साईनाथ मतसागर, अमोल बावचे, प्रभाकर बारसे आदींसह समर्थकांची उपस्थिती होती.  चिकटगांवकर म्हणाले, 2009 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर या मतदारसंघातील मतदारांनी मला तब्बल 50 हजार मते दिली. त्यावेळी शिवसेनेना उमेदवार आर.एम.वाणी यांच्यासमोर केवळ 1225 मतांनी माझा पराभव झाला. त्यामुळे मला 50 हजार मते देणाऱ्या मतदार राजाला ठोंबरे यांच्या प्रवेशाबाबत विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2014 च्या निवडणुकीत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करत काँग्रेसला विरगाव व लासुरगावच्या जागा दिल्या. त्यात कॉग्रेसच्या प्रत्येकी एक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आला. असे असतांना उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेची  हातमिळवणी करून दगा दिला असा आरोप त्यांनी केला. मग अशा दगाबाजांना पक्षात घेऊन काय साध्य होणार ? असा सवाल चिकटगावकर यांनी उपस्थित केला.

हे तर आ. चव्हाणांचे षडयंत्र…!

पंकज ठोंबरे यांच्या प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट चिकटगावकर यांनी केला. जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत निवडणुकीआधी स्वतंत्र गट निर्माण करून तिथे त्या आमदाराला  पाडायचे असे चव्हाण यांचे धोरण असून त्यांनी याआधी पैठणचे आमदार संजय वाघचौरे व कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना याच पद्धतीने पाडले आहे. तोच कित्ता आता वैजापुरमध्ये गिरवून वैजापुरमध्येही राष्ट्रवादी कॉग्रेसचा आमदार होऊ द्यायचा नाही या दृष्टीने त्यांनी ठोंबरेचा गट निर्माण केला आहे असे चिकटगावकर म्हणाले.