थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुन्हा एकदा शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे वर्चस्व ठरवणार

मुंबई,​९​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- अंधेरी पोटनिवडणुक पार पडताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची धुमशान पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेनेत दोन गट पडल्याने शिंदे आणि ठाकरे गट असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राज्य शासनाबरोबरच नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींवरही दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुन्हा एकदा शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे वर्चस्व ठरवणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे. 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रकिया सुरू होणार असून 18 डिसेंबर रोजी मतदान व 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.