अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही – जयंतराव पाटील

मुंबई,८ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- जोपर्यंत विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.

अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विद्यमान कृषिमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकारमधील एक जबाबदार पदावरील व्यक्ती महिलांविषयी असे वक्तव्य करणे हे निषेधार्ह आहे. त्यामुळे महिलांविषयी पातळीसोडून वाश्चाता करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही या भूमिकेतून पक्षाच्या शिष्टमंडळाने अब्दुल सत्तार यांना तातडीने बडतर्फ करावे अशी राज्यपाल महोदयांकडे मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, रुपेश खांडके उपस्थित होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. मंत्रीमंडळात असणार्‍या अशा जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातील संसदेत काम करणाऱ्या एका महिला खासदाराबाबत अशाप्रकारे बोलणे कितपत योग्य आहे. सत्तार यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केल्याचे जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अब्दुल सत्तार यांची ही भाषा पहिलीच नाही. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दारु पिता का असा प्रश्न विचारला होता.आता एखाद्या महिलेबाबत बोलणे, त्या संसदेत अतिशय पोटतिडकीने बोलतात त्यांच्याबाबत बोलणे ही तर हद्दच झाली आहे. मंत्र्यांनी काही मर्यादा सांभाळायच्या असतात. परंतु या मर्यादांचा वारंवार हे मंत्री उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.

राज्यपाल हे सर्वोच्च आहेत. सरकार ऐकत नसेल तर त्यांना आम्ही कैफियत मांडू शकतो. हा विषय माफी मागून संपणार नाही. हवे ते विधान करता मग माफी मागता हे महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारमधील लोकांनी विचार करावा, त्यांना आपले सहकारी कसे हवेत. अब्दुल सत्तार यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही. मंत्री आहेत म्हणून पोलीस घाबरत असतील तर पोलिसांनी आपल्या कर्तव्यापासून चुकू नये, सरकार येत आणि सरकार जात असतात असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी केले.

या सरकारमधील मंत्र्यांची महिलांविषयी काय भूमिका आहे, महिलांचा द्वेष कशापद्धतीने करतात, यांचा महिलाविषयी काय विचार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारमधील मंत्री कसे असावेत याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा आणि मंत्र्याने जे वक्तव्य केले आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? असा सवाल करतानाच मंत्र्यांची ही भूमिका भाजपला मान्य असेल तर बडतर्फ करणार नाही आणि मान्य नसेल तर धाडसाने सरकार येत जात असतात. त्यामुळे कुणाकुणाला पदरात घ्यायचे व कुणाची ओझी उचलायची हे एकदा भाजपने ठरवले पाहिजे, असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला.