गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला वेग

समाज कल्याण आयुक्तांचा ऊसतोड कामगारांशी थेट बांधावर जाऊन संवाद

मुंबई,​६​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून पुणे येथे महामंडळाचे मुख्यालय कार्यान्वित झाले आहे.

ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज रोजी माजलगाव महेश साखर कारखाना बीड परिसरात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांसोबत चर्चा करुन त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहे. त्यामुळे महामंडळाच्या कामकाजाला वेग आला आहे.

या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना तयार करण्यात येत असून त्याअंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी शासनाने व्यापक मोहीम राबवून ओळख प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे.

यावेळी औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय पुणेचे बाळासाहेब सोळंकी, रविंद् शिंदे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड, ऊसतोड कामगार संबधाचे पदाधिकारी, ऊसतोड कामगार, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यात नुकतेच शासकीय वसतिगृह देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्या  अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत ,जामखेड व बीड या ठिकाणी प्रत्यक्ष वसतिगृह सुरू झाली आहेत.