लातूरच्या तालुक्याच्या ठिकाणी शंभर खाटांच्या उपलब्धतेसाठी आराखडा सादर करावा – पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि. 17 :- जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शंभर खाटांची उपलब्धता होण्यासाठी प्रशासनाने आराखडा सादर करावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

औसा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित कोवीड-19 आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, तानाजी चव्हाण, श्रीशैल्य उटगे, अभय साळुंके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी मृत्यूचे दर सहा टक्के होते ते आता कमी होऊन 3.2 टक्क्यावर आले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी शुभसंकेत देणारी आहे. त्यामुळे आता लातूरची चिंता कमी झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर येत्या सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व मंडळानी मंडळाच्या अध्यक्षांच्या घरी गणपती बसवून गणशोत्सव साजरा करावा आणि एक नाविण्यपूर्ण उपक्रम तयार करावा, अशा सूचना केल्या. तसेच महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंपधारकांना पेट्रोल पंपावर आलेल्या वाहनचालकाची अंटीजन तपासणी करणे हा एक नाविण्यपूर्ण उपक्रम घ्यावा. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी, असे पालकमंत्री देशमुख यांनी सूचित केले.

कोरोनाबाधित रुग्णाचा अंत्यविधी करणारे लोक हे जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यासाठी शासनाच्यावतीने कोणत्या माध्यमातून मदत देता येईल ते पहावे. मालेगाव काढा हे आयुवेर्दिक आहे ते किमान सकाळ संध्याकाळ घ्यायला पाहिजे यासाठी या काढ्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे श्री. दुशमुख यांनी सूचविले.

शासकीय रुग्णालयात रुग्ण आल्यावर त्याला आदरपर्वूक वागणूक देवून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. तसेच बाधित रुग्णांचा मृत्यू कोणत्या गणातून झाला आहे याची माहिती तहसीलदारामार्फत घेण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाने व आरोग्य यंत्रणेने मृत्यूदर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश पालकमंत्री देशमुखांनी दिले. प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्या व्यक्तींची स्वाब तपासणी केली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट किट द्वारे तपासणी मोहीम राबवावी. त्याकरिता आवश्यक असलेल्या किट्सची मागणी करून त्या त्वरित उपलब्ध कराव्यात, असे ही त्यांनी निर्देशित केले.

शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व टॉयलेट व बाथरूम नियमितपणे स्वच्छ ठेवले गेले पाहिजेत तसेच कोरोनाच्या अनुषंगाने रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. रुग्णालय बद्दल कोणत्याही नागरिकांची तक्रार येणार नाही. तसेच कोणत्याही साहित्याची कमतरता भासणार नाही. शासकीय रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयातही सर्व साहित्याचा उपलब्ध आहे की नाही याबाबत पाठपुरावा करुन प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

जिल्ह्यात प्रत्येक धार्मिक कार्यक्रम, लग्न, अंत्यविधी कार्यक्रमास व सार्वजनिक ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे सूचित केले. लातूर येथे एवढ्या चांगल्या सुविधा उपलब्ध असताना उपचारासाठी लोक बाहेरगावी का जातात याची माहिती घ्यावी आणि त्याबाबत काय उणीवा आहेत याची माहिती घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत 24 तास कोविड-19 चे काम करत आहेत. तसेच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी कौतूक केले. प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व इतर सर्व अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी श्रीशैल्य उटगे आणि अभय साळुंके यांनी औसा शासकीय रुग्णालयात दोनशे खाटांची उपलब्धता व ट्राम केअर सेंटर सुरु करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *