नियुक्त उमेदवारांनी आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी – पालकमंत्री संदीपान भुमरे

पालकमंत्री व सहकार मंत्र्यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित

औरंगाबाद,३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये राज्यभरात 75 हजार उमेदवारांना रोजगार देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्याचा आज शुभारंभ होत असून औरंगाबाद विभागात 238 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत  राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित  रोजगार मेळाव्यातील निवड झालेल्या  उमेदवारांना पालकमंत्री श्री भुमरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

                याप्रसंगी सहकार मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,  महवितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले, उपायुक्त श्री मिनियार,अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, अधिकारी, कर्मचारी व उमेदवार उपस्थित होते.

                आज देण्यात आलेल्या  नियुक्त्या उर्जा उपविभाग, मंत्रालय मध्ये राज्य परिवहन विभाग, वीज वितरण कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग या विभागात उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या.