शेतकरी – पशुपालक बांधवांनी यावर्षीचा पोळा साधेपणाने साजरा करावा – धनंजय मुंडे

बीड /परळी (दि. १७) —- : भारताच्या कृषिप्रधान संस्कृतीतील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी – पशुपालक बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत; तसेच जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पोळा साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हावासियांना आवाहन केले आहे.

शेतकऱ्याचा सर्वात जवळचा साथी असलेल्या बैलाची व शेती संबंधित पशुंची पूजा करून वाजत गाजत आनंदाने मिरवणूक काढण्याची परंपरा पोळ्याच्या निमित्ताने दरवर्षी वृद्धिंगत होत असते. यानिमित्ताने वर्षभर मेहनत करणाऱ्या बैलजोडीचे, पशूंचे शेतकरी जणू आभार मानत असतात.

बीड जिल्ह्यात विशेषकरुन ग्रामीण भागात या दिवशी दरवर्षी शेतकरी बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो.परंतु राज्य व जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील काही महत्वाच्या शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हा प्रशासनाने पोळा सणाच्या निमित्ताने सार्वजनिक उत्सव – मिरवणूक करण्यास मनाई केली आहे.

जिल्ह्यातील जनतेने गेल्या काही दिवसात अत्यंत संयमपूर्वक या परिस्थितीचा सामना करत सर्वधर्मीय सण – उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे पोळ्याचा सण साधेपणाने साजरा करावा, आपल्या बैल जोडी आदी पशूंचे पूजन घरच्या घरी व साधपणाने करावे, काही गावातील परंपरेनुसार सार्वजनिकरित्या पशुंची मिरवणूक इत्यादी न काढता कोणत्याही ठिकाणी गर्दी जमवू नये व प्रशासकीय सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *