अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत – कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

औरंगाबाद, जालना, व बीड जिल्ह्यात कृषिमंत्र्यांकडून पाहणी

औरंगाबाद /बीड /जालना ,२१ ऑक्टोबर/प्रतिनिधी :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.

         औरंगाबाद तालुक्यातील दुधड, लाडसावंगी,शेकटा, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव, धोपटेश्वर , लालवाडी, जालना तालुक्यातील जामवाडी ,पानशेंद्रा, अंबड तालुक्यातील अंतरवाला, गोलापांगरी, वडीगोद्री, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाडळसिंगी, जप्ती पारगाव गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सहानुभूती पूर्वक संवाद साधून त्यांना धीर दिला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात सोयाबीन, तूर, बाजरी, कापूस आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर श्री. सत्तार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असे शेतकऱ्यांना कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

          यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार नारायण कुचे,जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख  चंद्रकांत नवले, तालुकाप्रमुख शिनुभाऊ बेंदरे,  कृष्णा वांगीकर, तहसीलदार सचिन खाडे, तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते,औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे,जालना उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पंडीतराव भुतेकर, विजय दावनगावकर, जालना, बदनापूर, अंबड तालुक्याचे तहसीलदार, कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

            कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी गेवराई तालुक्यातील गेवराई व  पाडळसिंगी तसेच बीड तालुक्यातील पारगाव जप्ती या तीन ठिकाणी अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बांधावर संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले. नुकसानग्रस्त कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.