सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही – कृषीमंत्री

मुंबई ,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. मात्र, राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण ज्या भागामध्ये नुकसान झाले आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झाले ते समजेल, असे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. तसेच राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

परतीचा पाऊस हा काही पहिल्या वर्षी झाला असे नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही, असेही सत्तार म्हणाले. जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे. त्या नुकसानीचा आकडा लवकरच कळेल. त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे सत्तार म्हणाले. प्रत्येक वेळी कृषी विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होते. साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारने आतापर्यंत दिली आहे. पुढच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले.

पहिल्या नुकसानीचे तीन हजार ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. ६०० कोटी रुपये नंतर दिले त्यानंतर गोगलगाईने नुकसान झालेल्या क्षेत्राला देखील मदत दिली असल्याचे सत्तार म्हणाले. गेल्या २५ वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झाले असल्याचे सत्तार म्हणाले. विरोधी पक्षाला फक्त विरोधच करायचा आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आत्महत्येसारखे पाऊस उचलू नका. हा अंतिम पर्याय नसल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.